Tuesday, 17 February 2026

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. 
प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी 

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र  हा भारतीय इतिहासातील मानबिंदू समजला जातो. त्यांच्या कारकीर्दीचा आढावा घेण्याच्या कार्यात अनेक अभ्यासकांनी संपूर्ण जीवन समर्पित केले आहे.  अजूनही नवनवीन अभ्यासक शिवचरित्रातील नवनवीन दुवे  शोधून त्यावर संशोधन करीत आहेत.  महाराजांच्या संपूर्ण आयुष्याचा पट विचारात घेणे ही एक प्रदीर्घ साधन आहे त्यामुळे ज्या घटनेमुळे शिवाजी महाराज छत्रपती झाले त्या राजाभिषेकाच्या निमित्ताने दिसून येणारे त्यांचे काही पैलू सदर निबंधात मांडण्याचा  प्रयत्न  केला आहे.यासाठी राजभिषेक पोथीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे आणि नेतृत्व या विषयाचे पैलूही अभ्यासले आहेत.

 नेतृत्व ही एक सशक्त संकल्पना आहे. समाजाचे आणि राष्ट्राचे भवितव्य घडविणाऱ्या नेतृत्व पद्धतीवर अलीकडे विशेष अभ्यास केला जात आहे.  नेतृत्व या संकल्पनेमध्ये वेगवेगळे पैलू सामावलेले आहेत जे छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतात.  त्यामुळे तरुण पिढीतील युवक -युवतींना मार्गदर्शनपर आणि प्रेरणादायी असे जे शिवरायांचे पैलू राजाभिषेकाच्या निमित्ताने दिसून येतात तेवढ्याच पैलूंचा विचार या निबंधात केला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वश्रुत आहे तो समाजासमोर ठेवण्यासाठी अनेक अभ्यासकांनी उपलब्ध ऐतिहासिक साधनांचा पुरेपूर वापर केला आहे आणि शिवरायांचा जीवनपट नोंदवण्याचा प्रयत्न केला आहे.  या ऐतिहासिक पुराव्यांमध्ये काही त्रुटी, दोष असू शकतात अशी शक्यताही अभ्यासकांनी गृहीत धरली आहे त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या, पुस्तक रूपाने प्रकाशित साहित्याचाच वापर सदर अभ्यासासाठी केला आहे. 

राजाभिषेकाच्या घटनेचे परिशीलन  करण्यापूर्वी शिवपूर्व काळातील परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे.  प्राचीन भारतातील शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक व आर्थिक संपन्नता यामुळे विविध वंशाचे विदेशी लोक भारतात प्रवेश करते झाले.  तत्कालीन सामाजिक व्यवस्थेनुसार चातुर्वर्ण्यात ते कोठे ना कोठे सामावले गेले असतील पण इस्लामी परंपरेचा भारतात प्रवेश झाला आणि भारतवर्षात उलथापालथ झाली.

इसवीसन १५२६ च्या आसपास मुगल सम्राट बाबर याने साम्राज्य स्थापन केले. अकबराकडून साम्राज्याचा विस्तारही झाला.  या साम्राज्य विस्तारात भारतीय हिंदू प्रजेवर अत्याचार झाले.  हिंदू धर्म संकटात आला.  मोगलांनी आपल्या नावाची नाणी प्रचारात आणली.  आपल्या नावाचा खुलता मशिदीत वाचण्याचे बंधन घातले.  प्रादेशिक राज्य नष्ट करून स्वतःचा सर्वत्र अंमल प्रस्थापित केला. औरंगजेबाच्या कारकिर्दीत त्याला आव्हान देणारे एकही स्वतंत्र राज्य हिंदुस्थानात नव्हते. शिवजन्मावेळी विजापूर गोवळकोंडा व अहमदनगर या तीनच शाही अस्तित्वात होत्या.  निजामशाहीसाठी शहाजीराजांची  धडपड चालू होती.  या सर्वात मोगलांचे वर्चस्व निर्विवाद होते.  मुघल सत्ता मदांध आणि असहिष्णु  होती .  तिच्यासमोर हिंदुस्थानातील प्रजा केविलवाण्या परिस्थितीत जगत होती. त्यामुळे या विपरीत संघर्षमय  परिस्थितीचा  अत्यंत धीरोदात्तपणे व आत्मविश्वासाने सामना करून धर्म संस्थापनेसाठी स्वराज्य स्थापना करण्याचे महत्त्वाचे कार्य शिवरायांनी केले आहे आणि त्यामुळेच कृष्णाजी अनंत सभासद यांनी म्हटले आहे “या पृथ्वीवर सर्वत्र बादशहा असताना एक मराठी राजा छत्रपती झाला ही सामान्य गोष्ट झाली नाही.”

आनंद नाम संवत्सर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ म्हणजेच६ जून १६७४  रोजी झालेली राजाभिषेकाची घटना ही एक केवळ धार्मिक विधीशी संबंधित घटना नाही. सार्वभौम स्वराज्याला अधिकृत नेतृत्व उपलब्ध करून देणारी ती एक क्रांतिकारक घटना म्हणावी लागेल.  अशा नेतृत्वाचे काही पैलू मानले जातात ते असे- मानव समूहाच्या दुःखाने अस्वस्थ झालेल्या मनाने त्या दुःखातून मुक्त होण्यासाठी नव्या जीवन पद्धतीचा विचार रुजवावा ती पद्धत स्वीकारणार यांचे जीवन सुखी व आनंदी व्हावे यासाठी स्वतःच्या चिंतनातून प्रवचनांमधून स्वतः निर्माण केलेल्या सुसूत्र संघटनेमधून जो कामाला लागतो तो नेता. 
दडपशाही व जुलुमाने त्रस्त झालेल्या मराठी माणसाला स्वतःविषयी अभिमान वाटावा, त्यांना स्वतंत्रपणे मानाने जगता यावे याची तीव्र तळमळ शिवरायांना लागली होती.  त्यातूनच बालवयापासून त्यांनी उत्तम -उत्तम माणसे हेरून समाजातल्या सर्व स्तरातील सदस्यांना सोबत घेऊन संघटना निर्माण केली व बाह्य परिस्थितीशी प्रयत्नपूर्वक झुंज देत समाजावर नियंत्रण मिळविले.  पण ते नियंत्रण जाचाचे नसून त्यामध्ये प्रत्येकाला आपापल्या आचारानुसार वागण्याचे स्वातंत्र्यही त्यात होते.

नेत्यांमध्ये आवश्यक गुणांमध्ये संवेदनशीलता, आकलन शक्ती, स्मरणशक्ती, प्रतिभा शक्ती ,दृष्टेपणा, विवेक, निर्णय शक्ती, निर्भयता, आस्था, निष्ठा, धैर्य, साहस, न्यायप्रियता, नम्रता, कृतज्ञता इत्यादी विविध पैलू असणे अपेक्षित असते. शिवरायांच्या संपूर्ण आयुष्यात हे पैलू विविध प्रसंगातून दिसतात व या सर्व पैलूंचा समुच्चय म्हणजे अंतिमतः स्वराज्य स्थापना आणि त्या निमित्ताने शिवराय छत्रपती होणे. 
परित्राणाय साधूनां विनाशाय  च दुष्कृतां। धर्म संस्थापनार्थाय संभावामि  युगे युगे।। यामध्ये 
श्रीकृष्णांनी सांगितलेले धर्म संस्थापनेचे सूत्र वास्तवात येण्यासाठी शिवचरित्रातील राजाभिषेकाची  घटना महत्वाची ठरते. 


शेतकरी ज्याप्रमाणे गवत काढून टाकून धान्य देणाऱ्या रोपांचे रक्षण करतो त्याप्रमाणे राजाने विरोधकांचा उच्छेद करून राष्ट्राचे रक्षण करावे हे स्मृति वचन शिवरायांनी तंतोतंत आचरणात आणले.  बाह्य परिस्थितीचे अचूक आकलन करून त्यादृष्टीने प्रजाहितासाठी  स्वराज्य स्थापनेचा शिवरायांचा विचार राजाभिषेकामागे दिसतो. भागवत धर्माच्या प्रसारामुळे मराठी प्रदेशात धर्म आचरण्यासाठी एकत्र येण्याची जी प्रथा सुरू झाली त्यामुळेच तो धर्म परकियांपासून रोखण्यासाठी एकजुटीने तोंड देण्याची कल्पनाही त्यातून निघाली.  एकत्र आलेल्या लोकांना चिरकाल एकजुटीने राहायचे असेल तर त्यांच्यात परस्पर विश्वास निर्माण व्हावा ज्यात  सर्वांचे कल्याण असेल.  शिवरायांनी स्वराज्य स्थापनेतून हे केले.  महाराष्ट्रातील जनतेला शिवरायांबद्दल नितांत आदर होता. असे असले तरी लहान-मोठे वतनदार जहागीरदार हे शिवरायांना राजा म्हणायला तयार होतेच असे नाही.  प्रजेच्या मनातील शंका दूर करून प्रजेला एकछत्री साम्राज्य देणे आवश्यक आहे हे शिवरायांनी अचूक ओळखले होते.  महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक, राष्ट्रीय, एकात्मतेसाठी छत्र सिंहासनाची  अधिकृत स्थापना ही आवश्यक बाब आहे हे शिवरायांनी हेरले व त्यातूनच राजाभिषेकाची कल्पना पुढे आली असावी.


राज्यकारभारातील काही तांत्रिक अडचणी पूर्णपणे सोडवण्यासाठीही एकछत्री अंमल गरजेचा होता. उदाहरणार्थ ब्राह्मण गुन्हेगाराच्या दंड शासनाचे वाद उपस्थित झाले तर शिवराय त्याचा निवाडा  करू शकत नसत कारण परंपरेनुसार अभिषेक्त राजा ते नव्हते . त्यामुळे अशा निवाड्यांच्या आज्ञाही ब्रह्मवृंदांच्या नावे निघत.  सारांश छत्र सिंहासनाची स्थापना करून सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील अधिकार प्राप्त करणे हाही शिवरायांचा हेतू असावाच. या सर्व विचारातून परंपरेविषयी आस्था , आदर बाळगणारे सारासार विवेकशक्ती असणारे,  प्रजेप्रती निष्ठा असणारे आणि न्यायप्रिय शिवराय आपल्याला दिसतात. 

शिवरायांना राजाभिषेक करून घेण्याबाबत काही जाणकार मंडळींनी किंवा खुद्द विश्वेश्वर उर्फ गागाभट्ट यांनी सुचवले असे उल्लेख इतिहासात सापडतात. तथापि स्वराज्य विषयी प्रत्यक्ष आणि जागरूक असणाऱ्या शिवरायांच्या मनातही आधीपासूनच हा विचार असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. केवळ ऐतिहासिक पुराव्याअभावी त्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही.  परंतु राजकारणात व समाजकारणात धोरणी व सजग  असलेल्या राजांनी हा विचार स्वतःपुरताच ठेवला असावा व योग्य  वेळ येताच आपल्या सहकाऱ्यांच्या विचारानुसार त्याची अंमलबजावणी केली असावी. शिवरायांचा राजाभिषेक ही केवळ एक लहानशी धार्मिक घटना नाही त्याला राजकीय व सामाजिक संदर्भही आहेत हेही विचारात घेणे आवश्यक आहे. कोणत्याही साम्राज्य सार्वभौम होण्यासाठी गरज असते छत्र, चलन व शकाच्या प्रारंभीची.  या तिन्ही गोष्टींवर राजांनी बराच काळ आधीपासून नक्कीच विचार केला असणार व नंतर योग्य संधी पाहून तो प्रत्यक्षात उतरविला असणार राजाभिषेकाच्या अधिकृत माध्यमातून.



राजाभिषेक विधीसाठी काशीचे विद्वान पंडित विश्वेश्वर उर्फ गागाभट्ट यांचे मार्गदर्शन घेण्यात आले यामध्येही काही प्रवाह आढळतात. शिवरायांची कीर्ती ऐकून स्वतः गागाभट्ट त्यांना भेटायला आले व त्यांनी महाराजांना
 राजाभिषेकाबद्दल सुचवले. राजाभिषेक करण्याचे निश्चित  झाल्यावर महाराजांनी धर्मशास्त्र पारंगत गागाभट्टांना अत्यादराने काशी येथून  पाचारण केले. राजाभिषेक विधीचे विविध पर्याय धर्मशास्त्रीय ग्रंथातून सांगितलेले आहेत. परंतु गागाभट्टांनी शिवरायांच्या कौटुंबिक, धार्मिक व सामाजिक परिस्थितीचा विचार करून मगच राजाभिषेक विशेष विधी तयार केला याबाबत अभ्यासकात एकमत आहे.  वस्तुतः स्वतः विद्वान पंडित असल्याने गागाभट्टांनी विविध धर्मशास्त्रीय ग्रंथांचा साकल्याने अभ्यास करून शिवरायांचे  मौंजीबंधन , विवाह,प्रायश्चितरूप तुलापुरुषदान   व नंतर प्रत्यक्ष राजाभिषेक अशी योजना केलेली दिसते. यासाठी त्यांना याविषयीचा अभ्यास करण्यास पुरेसा अवधी लागला असेल हे गृहीत धरावे लागेल.  त्यामुळे राजाभिषेकाची कल्पना मांडली जाणे व ती प्रत्यक्षात येणे यामध्ये निश्चितच एक मोठा कालखंड गेला असल्याची शक्यता नाकारता येणार नाही असे अभ्यासक म्हणून नोंदवावेसे वाटते. 
शिवरायांना राजाभिषेक होण्यापूर्वी त्यांच्या क्षत्रियत्वासंबंधी काही पेच प्रश्न पुढे झाल्याचे इतिहास सांगतो. यावेळी क्षत्रियांचे कलियुगात अस्तित्व नाही असे प्रतिपादन करणारा शूद्राचार्य शिरोमणी हा कृष्ण नृसिंह शेषाचा ग्रंथ व त्यातील विचार पुढे आला. शिवराय हे जिज्ञासू चौकस व नीतीप्रिय असल्याने आपले  क्षत्रियत्व सिद्ध करण्यासाठी  शिवरायांनी उत्तर हिंदुस्थानात उदेपूर इत्यादी ठिकाणी  माणसे पाठविली व त्या प्रांतातील राजाभिषेक समारंभाची माहिती व भोसले कुलाची पूर्व पीठिका मागविली . 

स्वराज्याची जी गोष्ट करावयाची ती धर्मसंमत मार्गाने करण्याचा शिवरायांचा स्वभाव यातून दिसतो.गागाभट्टांनी आपल्या कायस्थ धर्म प्रदीप ग्रंथात म्हटले आहे की मोगलांच्या दक्षिणेतील  स्वारीत हिंदू स्वारही येत .. त्यांना रजपूत म्हणण्याचा प्रघात होता त्यामुळे सिसोदे वंशातील शिवाजी हे क्षत्रिय होत व त्यामुळे त्यांचा राजाभिषेक होऊ शकतो.  मात्र राजाभिषेकापूर्वी शिवरायांचा व्रतबंध (ब्रह्मचर्य आश्रम प्रवेश) त्याचे प्रायश्चित्त  कारण क्षत्रियाचे उपनयन बाविसाव्या वर्षापर्यंत होत असल्याने म्हणून तुलापुरुष दानविधी व नंतर पत्नीशीच पुन्हा एकदा विवाह  करून गृहस्थाश्रम स्वीकार व त्यानंतरच छत्रपती पदासाठी राजाभिषेक अशी योजना केली गेली. गागाभट्ट व पैठणचे त्यांचे गुरुबंधू अनंत देवभट्ट यांच्या या निर्णयांना अन्य ब्रह्मावृंदांनीही मान्यता दिलेली दिसते. गागाभट्ट हे केवळ पौरोहित्य करणारे भिक्षुक नसून ते धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक होते त्यामुळे त्यांचे निर्णय अन्य ब्रह्मावृंदांनी स्वीकारणे कठीण झाले नाही. एखादी महत्त्वपूर्ण घटना संपन्न करताना त्याचे कार्यवाही करण्यासाठी अचूक व्यक्तीची पारख करण्याची शिवरायांची हातोटी राजाभिषेक व गागाभट्ठ भेटतो या योजनेतही दिसून येते.

गागाभट्ट यांनी  तयार केलेल्या योजनेनुसार भोसल्यांचे कुलपुरोहित प्रभाकरभट्ट बाळंभट्ट आर्वीकर यांनी 
राजाभिषेकाचे पौरोहित्य केल्याची नोंद आढळते.

 शिवरायांनी राजधानीसाठी रायरी म्हणजे रायगडाची निवड केली हे वैशिष्ट्यपूर्णच आहे भौगोलिक प्रदेशाची बारकाईने माहिती, संरक्षण विचार गडाची अभेद्यता या सर्व बाबींचा शिवरायांनी पूर्णतः अभ्यास करून मगच रायगडाची निवड राजधानीसाठी केली.  सातारा व पुण्याच्या सीमेवरच्या सह्याद्रीच्या दुर्गम प्रदेशातील हा भाग या प्रदेशातील सर्वात उंच टापू !
या जोडीने राजाभिषेकादरम्यान कोणतेही संकट स्वराज्यावर येऊ नये याची काळजी ही शिवरायांनी घेतलेली दिसते. कोकणात दिलेरखान उतरणार होता परंतु शिवाजीने ठिकठिकाणी डोंगरातील वाटा मोडून अवघड ठिकाणी कडक पहारे ठेवल्यामुळे तो परत फिरला असा उल्लेख नारायण शेणवी यांच्या पत्रात मिळतो.  सावधपणाने व सजगतेने भविष्यकालीन संकटे ओळखून त्यावर मात करण्याची शिवरायांची योजना यातून दिसते.
मराठ्यांचे राज्य हे शास्त्रनियम, नीतीसंस्कृती संपन्न व घटनाबद्ध शासन संस्था असेल याची सर्वतो परि योजना शिवरायांनी राजाभिषेकाच्या निमित्ताने केली.  आपल्या सार्वभौमत्वाची चिह्ने म्हणून छत्रधारण, नाणी व चालू करणे या महत्त्वाच्या गोष्टी शिवरायांनी केल्या. 
प्रतिपद चंद्रलेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता।: शाहसुनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।

अशी स्वतःची मुद्रा संस्कृत भाषेत तयार केली. मोगलांच्या वर्चस्वामुळे उर्दू व  फारसीचा सर्वत्र प्रसार असताना परंपरागत संस्कृत भाषेत आपली मुद्रा तयार करणे असे अभिमानास्पद कार्य करून शिवरायांनी आपली पारंपरिक अस्मिता जपली आहे. राराज्यविषयक  नंतरच्या सर्व कागदपत्रांमध्ये स्वस्तिश्रीने पत्रांची सुरुवात महाराजांनी केली आहे व स्वतःचे नाव श्री राजा शिवछत्रपती असे वापरले आहे.  राजाभिषेकाच्या निमित्ताने शिवरायांनी स्वतःची नाणी वापरात आणली त्यांना शिवराई म्हटले जाते. तांब्याच्या या नाण्याच्या एका बाजूला श्री राजा शिव असा मजकूर असून दुसऱ्या बाजूला छत्रपती असा मजकूर आहे. देवनागरी लिपीतील या नाण्यांच्या मजकुरातून महाराजांचे महाराष्ट्र भाषेचे प्रेम स्वराज्याचे सार्वभौमत्व दिसून येते महाराजांनी आपल्या राजाभिषेकाबरोबर सुरू केलेला व हिंदवी स्वराज्याची धर्मप्रतिष्ठा कायम करणारा राजाभिषेक शक. या शकाचे वैशिष्ट्य आहे की त्याला महाराजांनी स्वतःचे नाव दिले नसून राजाभिषेकाच्या प्रसंगाचे उचित असे नाव दिले आहे स्वराज्यासाठी अपारंपार तळमळीने कार्यरत राजांनी यामध्ये स्वतःकडे मोठेपणा घेतलेला नाही. 

 नेत्याच्या अंगभूत असे विनयशीलता व नम्रता असे महाराजांचे पैलू यातून दिसतात. राजाभिषेकापूर्वी प्रतापराव गुजर यांचे निधन झाले. राजांच्या पत्नी काशीबाई देवाघरी गेल्या.  परंतु या दोन्ही दुःखी घटनांचा  धीराने सामना करून वैयक्तिक दुःखाला बाजूला ठेवून शिवरायांनी राजाभिषेकाची सिद्धता केली. प्रजाहितार्थ घडणाऱ्या महत्वपूर्ण प्रसंगात राजांनी वैयक्तिक दुःखाला महत्त्व न देता स्वराज्याच्या  कार्याला अधिक महत्त्व दिले यातून त्यांची धर्म संस्थापनेची तळमळ व प्रजेवरील प्रेम दिसून येते.या निमित्ताने  हिंदू धर्मामध्ये महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या भगव्या झेंडाला त्यांनी राजचिह्न म्हणून स्थान दिले. मुस्लिम अमदानीत फारसी व उर्दूचा वापर व्यवहारात सर्वत्र होत असे.  महाराजांच्या विशेष सू चनेनुसार रघुनाथ पंत हणमंते यांनी कर्नाटकातील धोंडीराज लक्ष्मण व्यास यांच्याकडून राज्यव्यवहार कोश तयार करून घेतला. त्याद्वारे संस्कृत परिभाषा प्रचारात आणली. 

मराठी मनाची  आद्य भाषा म्हणून संस्कृतचा आग्रहाने वापर केला गेला.  शिवरायांची  भारतीय परंपरागत अस्मिताच यातून दिसते.  स्वराज्यातील प्रजेच्या जवळ जाण्याचा हा एक मार्ग होता. याद्वारे प्रजेला स्वराज्य हे आपले वाटावे असा शुद्ध हेतू प्रकट होतो.  शिवरायांना स्वतःसाठी राज्य नको होते तर ते सर्वसामान्य जनतेच्या सुखासाठीच हवे होते. 

 मनुस्मृती मध्ये  म्हटले आहे-
 त्रैविद्येभ्यस्त्रयीं विद्यां दण्डनीतिं च शाश्वतीम् ।
आन्वीक्षिकीं चात्मविद्यां वार्तारम्भांश्च लोकतः ॥७.  ४३ ॥

तिन्ही वेदांचे ज्ञान असणाऱ्याकडून उपयुक्त ज्ञान, दंडनितीतील शाश्वतत्वे इत्यादी ज्ञान राजाने जाणकाराकडून घ्यावे. राजाभिषेकाच्या निमित्ताने  तयार करून घेण्यात आलेला धार्मिक विधी,  राज्यव्यवहारकोश रचना या शिवरायांनी करून घेतल्या. 
शिवरायांनी स्वराज्याच्या व्यवस्थापनासाठी अष्टप्रधान मंडळ नेमले. चांगली परंपरा असलेले, शास्त्र जाणणारे ध्येयवादी, कुलवंत, चांगले पारखून घेतलेले असे आठ सदस्य नेमून त्यांच्या पदांची नावे ही महाराजांनी संस्कृत अशी ठेवली.

मुसलमानी साम्राज्य प्रभावाच्या शिखरावर असताना छत्रपती शिवरायांनी राजाभिषेक करून स्वतःला छत्रपती व प्राप्त करून घेतले ते भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठीच. वैयक्तिक सत्तेची लालसा त्यांच्या मनात नव्हती बालवयापासून स्वतःच्या आई-वडिलांच्या सहवासात त्यांनी मुघल सत्ताधिशांकडून झालेला रयतेचा जो छळ पाहिला होता त्याची सकारात्मक भरपाई त्यांनी स्वराज्य स्थापनेतून केली व त्यामुळे शतके लोटली तर या प्रजा पालक नेतृत्वाला महाराष्ट्र मन विसरू शकणार नाही.  हा शिवाजीराजांचा माणूस म्हणून विशेष पैलू मानावा लागेल. 

निश्चल पुरीच्या सांगण्यावरून इसवीसन १६७४ ललिता पंचमीच्या दिवशी शिवरायांचा तांत्रिक राज्याभिषेक संपन्न झाला गागाभट्टांसारख्या वेदपरायण व्यक्तीने केलेल्या राज्याभिषेकात निश्चलपुरींनी काही दोष दाखविले होते आदर्श राजा या नात्याने प्रजेतील सर्व लोकांच्या मतांचा यथायोग्य आदर करणे व आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे सर्वांची मने सांभाळणे हे चातुर्याचे धोरणही शिवरायांनी अवलंबलेले दिसते.

आधुनिक व भावी काळात समाजात उत्कृष्ट नेतृत्व घडणे ही काळाची गरज आहे.  भौतिक सुविधांची रेलचेल घेऊन अनेक परकीय साम्राज्य भारतात रुजू पाहत आहेत.  शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन ही आक्रमण थांबवण्याची गरज आज देशात निर्माण झाली आहे.  समर्थांच्या स्वप्नातील आनंदवन भारतात पुन्हा साकारण्यासाठी शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास करून तो आदर्श जगण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे असे नमूद करावे असे वाटते. 
प्रा. डॉ. आर्या जोशी

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...