Tuesday, 15 September 2020

शुभबुद्धीचे उपासक रवींद्रनाथ

 





फूल फुलले हीच फुलाची अंतिम कथा
फुलाचे साफल्य त्याच्या बहरण्यात आहे
फूल विचारते,"फळा, तू कुठे आहेस?"
फळ उत्तरते," मी तुझ्या हृदयातच आहे"!!!

वाचल्याक्षणी मनावर मोहिनी घालणारे हे शब्द नव्हे काव्य आहे गुरुदेव रवींद्रनाथ ठाकुर यांचे!
(ठाकूर हे त्यांचे मूळ आडनाव पण ब्रिटिशांनी तो उच्चार टागोर असा बदलला आणि पुढे तेच प्रचलित झाले)
रवींद्रनाथ म्हटलं की आधी समोर येतं शांतिनिकेतन आणि बंगाली चित्रपटांमधून ऐकलेलं आणि हिंदी चित्रपटगीतातही वापरलं गेलेलं रविंद्र संगीत!
हे पुस्तक म्हणजेही एक चित्र- पटच आहे! रवींद्रनाथांच्या सौंदर्यपूर्ण,कलासक्त आणि स्वतःच्या विचाराने प्रेरित झालेल्या आयुष्याचा!
लेखिका आशा साठे आपल्याला या पुस्तकांत रवींद्रनाथांच्या बरोबरीने आयुष्याचा अनुभव देतात,तशी संधी देतात!
रवींद्रनाथ यांचा परिसस्पर्श कविता,कथा,कादंबरी,नाटक,निबंध अशा सर्वच साहित्य प्रकारांना लाभला आहे! त्या सर्वातून त्यांची "शुभबुद्धी" ठायी ठायी दिसून येते.त्यांचं कार्य ही केवळ मनोरंजनाची बाब नाही तर ती रवींद्रनाथांची जीवनसाधनाच आहे!
या पुस्तकात काय आहे हे मी तुम्हाला नाही सांगणार! कारण ते तुम्ही वाचावं आणि अनुभवावं असं मला वाटतं म्हणून हा खटाटोप!
वृष्टी पडे टापुर टुपूर म्हणत जीवनगाणे गाणारे रवींद्रनाथ शाळेतल्या आयुष्याशी समाधानी नव्हतेच.खुला मोकळा निसर्ग त्यांना बालपणापासूनच खुणावू लागला. वडिलांच्या सान्निध्यात तीन महिने निसर्गसंपन्न प्रदेशात राहिल्याने त्यांच्या बालमनावर निसर्गाने हळुवार फुंकर घातली.दवाने भरलेल्या गवताचा वास,नारळीच्या झावळीतून येणारी उन्हे किंवा त्यांच्या पद्मा नावाच्या बोटीवरचा जलनिवास यांनी ते अधिक समृद्ध होत गेले!
भर तारूण्यात लाभलेला तरूण परिचित मित्र- मैत्रिणींचा सहवास त्यांना तारूण्याकडे आणि सोंदर्याकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देऊन जातो!आयुष्यभर केलेले वेगवेगळे प्रवास रवींद्रनाथांचे व्यक्तीमत्व बहरून आणि भारून टाकण्यात मोलाचे सहप्रवासी ठरले आहेत.
रवींद्रनाथांचा मानुषेर धर्म हा त्यांच्या सर्वच साहित्याचा आत्मा आहे. त्यांच्या साहित्यातील पुरुषपात्रे ही wishfull thinking मधून निर्माण झाली आहेत तर तर त्यांनी चितारलेल्या महिलांच्या व्यक्तिरेखांमधे महिलेचा आत्मसन्मान दिसून येतो. अशावेळी मग ही पात्र फक्त पात्रं उरत नाहीत!!!
कुटुंबातील जबाबदारी अंगावर पडल्यानंतरही आपली खानदानी जमीनदारी सांभाळणारे कविमनाचे रवींद्रनाथ आपल्याला पुस्तकात पुढच्या पानांवर भेटायला येतात. त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ स्थापन केलेले कार्य म्हणजे ब्रह्मचर्याश्रम विद्यालय! बालमन हे निसर्गाशी एकरूप होऊनच फुलते फळते या विचारातूनच शांतिनिकेतनची संकल्पना गुरुदेवांनी मूर्त रूपात मांडली! अशा मुक्त वातावरणात मुलांच्या शरीर -मन -बुद्धीचे पोषण करणारे शिक्षकच त्यांना हवे होते आणि ते तसे मिळालेही!!
शांतिनिकेतनाची सुरुवात ,त्यामागचा विचार आणि तेथील सर्व वर्णन वाचकांनी स्वतःहून वाचण्याचा निर्मळ आनंद नक्की घ्यावा!
विश्वभारती विद्यापीठ,ग्रामीण जनतेच्या उन्नतीसाठीचे श्रीनिकेतन,गीतांजलीची निर्मिती आणि नोबेल पुरस्कार,राष्ट्रगीताची रचना हा सर्व जीवनप्रवास आपण लेखिकेचं बोट धरूनच पुढे पुढे करत राहतो आणि एक आंतरिक शांतता अनुभवायला लागतो नकळतच!
देशकारण आणि राष्ट्रकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेतआणि त्या एकमेकांना पूरक आहेत असे म्हणणारे गुरुदेव आपल्याला राष्टीय अस्मितेची जाणीव करून देतात! त्यांची चित्रकला सौंदर्य लेऊनच येते आणि हे सौंदर्य म्हणजे सत्य!! असेही त्यांचा कुंचला रेखून जाताना आपण अनुभवतो!
जगदीशचंद्र बसू,शरदचंद्र चट्टोपाध्याय,अरविंद घोष,महात्मा गांधी यांच्या आणि रवींद्रनाथांच्या नात्याबद्दलही हे पुस्तक भाष्य करते.
कविता आणि रवींद्रनाथ हे एकमेकांपासून वेगळं करता येत नाही! फिरे चले माटिर टाने.. पदर पसरून तुझ्या मुखाकडे पाहत असलेल्या मातीकडे तू परत फिर असं सांगणारी गुरुदेवांची कविता म्हणजे त्यांचं रोजचं "जगणंच" होती! जगाची कविता लिहीणारा एक Master Poet आहे हे त्यांचे विचार त्यांची आध्यात्मिक साधनाही सूचित करतात!
मानव धर्म,देशकारण,शिक्षण,ग्रामीण विकास,नातेसंबंध,चित्रकला अशा जीवनाच्या विविधांगाला स्पर्श करणारे,निसर्गपुत्र रवींद्रनाथ! त्यांना जवळून भेटायचं असेल आणि त्याचा आनंद घ्यायचा असेल तर शुभबुद्धीने आपणही या प्रवासात जरूर सामील व्हा!!!

डाॅ.आर्या जोशी
पुस्तकाचे नाव- शुभबुद्धीचे उपासक रवींद्रनाथ
लेखिका- आशा साठे
सकाळ प्रकाशन
























पाऊस कविता

 



ओलं मन ओले भान

ओलं झालं पावसाच्या
पहिल्या पुस्तकाचं पान!
हिरवी अक्षरे, थेंबांचे शब्द
पुस्तक वाचताना, तन मन धुंद
पक्ष्यांची लकेर, मातीचं हसणं
या विरामचिह्नांनी, मजकुराचं सजणं
आकाशाचे मुखपष्ठ,
वार्‍याची खूणगाठ
प्रत्येक पान उलगडताना
घनघोर बरसात
मिटलं पुस्तक
मनही मिटलं
ओल्याचिंब रानाचं
पारणं फिटलं




नभ झाकोळ झाकोळ

 नभ झाकोळ झाकोळ

मनी कल्लोळ कल्लोळ
रानपक्ष्यांचे कूजन
त्याने नादले अंगण!
नभ भरून सावळे
उतरले दिठीपाशी
देहभान हरपले
चरणांच्या मिठीपाशी!
असा सोहळा चालला
माझे हृदय भरले
सावळ्याच्या आठवाला
श्यामघनही झरले!

आर्या.

बरसण्याची वाट पाहता

 तो काही येईना

काहिली साहवेना
झळा सोसवेना
विरहाच्या!
जीव थकला
डोळा शीण आला
दाटून येई गळा
कासावीस!
सखी म्हणे सईला
कुठे तो थांबला
वाट पाहून मंदावला
श्वास माझा!
सई देई दिलासा
नको जीव कासावीसा
येईल सुखाचा कवडसा
धीर धरी!
अचानक आला...
बरसून गेला..
सईला पोचविला
संदेश ओला...
आला ग शेवटी
पाणी आणवून दिठी
पाहून माझी कसोटी
ओलेता बिलगला!
आर्या

आषाढी एकादशी कविता

 धरती म्हणे मेघाला

चल जाऊया राऊळीला
विठूरायाच्या दर्शनाला
आली एकादशी!
बरसून तृप्त होऊ
टिळा मृद्गंधाचा लावू
भगवी पताका नाचवू
आली एकादशी!
पाने टाळ वाजवतील
वीजेचा पखवाज घुमेल
खळखळाटी वीणा झंकारेल
आली एकादशी!
आले विठुचरणासी
पाहिले रखमाराणीसी
पाहत राहीले आश्चर्यासी
आली एकादशी!
घन सावळा विटेवरी
धरती तृप्त उभी दिंडिरी
काय ही किमयागरी
आली एकादशी!
मी-तू पण एक झाले
द्वैत अवघेचि विरघळले
मेघ- धरती संतोषले
आली एकादशी!
आर्या














मनातलं काही..

 कुणीतरी येतं

घाव घालून जातं
तरीही आपण जगत राहतो...
कुणीतरी येतं
कासावीस करतं
तरीही आपण जगत राहतो...
कुणीतरी येतं
आरोपांच्या फैरी झाडतं
तरीही आपण जगत राहतो....
कुणीतरी येतं
मखमली पायघड्या घालतं
तरीही आपण जगत राहतो...
कुणीतरी येतं
गंधित आठवण देतं
तरीही आपण जगत राहतो..
कुणीतरी येतं
पाठीवर थोपटतं
तरीही आपण जगत राहतो..
कुणीतरी येतं
तोंड दाबून बुक्के मारतं
तरीही आपण जगत राहतो
कुणीतरी येतं
सहवासाची कस्तुरी देतं
तरीही आपण जगत राहतो...

मनभावन हा श्रावण

 सरली पौर्णिमा आली कृष्ण प्रतिपदा

सोनेरी उन्हाने पाठविले त्याच्या दूता!
झाली पेरणी लावणी थकले बाळ्या सर्जा
येईल नाचत व्रत वैकल्यांचा राजा
दिसेल इंद्रचाप धरा हिरवाई लेईल
आनंदाचा झोका फांदीफांदाला बांधेल
शिव पार्वती पूजन औक्षण बाळासाठी
कृष्ण जन्म घेईल कंसाच्या नाशासाठी
येईल नागोबा राखी मनगटी सजेल
सईसाजणीच्या मनीचे गुज उलगडेल
चला आता हळूहळू करा रे तयारी
हळदी कुंकवाने भरेल सृष्टीची कोयरी
हिरवाकंच खण, नथ पाऊसमोत्याची
रानफुलांनी भरेल परडी पूजेची
अशी धरा समाधानी करेल स्वागत
अशा श्रावणाची वाट मी ही पाहते मनात!

दीप अमावास्या

 दिव्याची अमावास्या-ज्ञानाची, तेजाची उपासना

डाॅ.आर्या जोशी
(धर्मशास्र अभ्यासक आणि संशोधक)
श्रावण महिना हा व्रतांचा राजा. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी कोणते ना कोणते व्रत धर्मशास्राने सांगितले आहेच. ऊन - पावसाचा निसर्गातील खेळ अनुभवत परमेश्वरचरणी लीन होण्याचा हा महिना. व्रत वैकल्ये आणि पूजा हे परस्परपूरक भाग आहेत.पूजेतील एक महत्वाचा उपचार असतो दीपपूजन. अंधार नाहीसा करून प्रकाशाकडे नेणारा दीप भारतीय धर्म -संस्कृतीत पूजनीय मानला गेला आहे.
ज्या समाजात विजेची उपलब्धता नव्हती त्या समाजरचनेत, कुटुंबरचनेत प्रकाश देणारी व्यवस्था म्हणजे दीप. तेलाचे वा तुपाचे नीराजन लावणे, कंदील लावणे, मशाली पेटवणे, पलिते पाजळणे यातून उजेडाची निर्मिती केली जाई.
घरातील पावित्र्याचे स्थान मानले गेलेले देवघर सूर्यास्ताला निराजनाच्या प्रकाशात उजळून निघे. संपूर्ण घरात आणि अंगणात तुळशीपुढेही दिवा लावण्याची पद्धत आजही घरोघरी दिसून येते.
शारदीय नवरात्रात अखंड नंदादीपाची स्थापना केली जाते. अंधार म्हणजे अज्ञान आणि प्रकाश म्हणजे ज्ञान. अंधारातून प्रकाशाकडे म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा हा दीप.
आषाढ महिन्याच्या सांगतेला म्हणजे श्रावण महिन्याच्या उंबरठ्यावर असे दीपपूजन केले जाते. अमावास्या हा दिवस म्हणजे चंद्रबिंबाचे दर्शन न होण्याचा दिवस. सृष्टी अंधारात बुडलेली असताना अमावास्येला असे दीपपूजन औचित्याचे आहे.
केवळ देवापुढीलच नव्हे तर संपूर्ण घरातील वापरायचे दिवे या दिवशी घासूनपुसून लख्ख केले जातात. त्यात तूप घालून वाती लावून देवघरात ते ठेवले जातात. देवाप्रमाणेच त्यांची पूजा केली जाते. चातुर्मासाच्या कथेत दोन भिन्न कुटुंबातील दिव्यांचा संवाद येतो. यातून स्वच्छतेचे महत्वच दिसून येते. आपल्या रोजच्या वापरातील वस्तू स्वच्छ ठेवणे, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे यालाही भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान दिले गेले आहे.
धातूच्या दिव्यांच्या जोडीने दिव्याच्या अमावास्येला पुरणाचे वा कणकेचे दिवे केले जातात.ते प्रज्वलित करून त्यांचीही यथोचित पूजा केली जाते.
भो दीप ब्रह्मरूपः त्वं ज्योतिषां पतिरव्ययः
आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वार्थांश्च प्रयच्छ मे।
हे दीपा, तू ब्रह्मस्वरूप आहेस. अनंत ज्योतींचा पती आहेस. तू आम्हाला उत्तम आरोग्य, संतती दे अशी प्रार्थना दिव्याला केली जाते.
सोमवारी येणारी अमावास्या ही सोमवती अमावास्या म्हणून ओळखली जाते. लोकदैवतांच्य उपासनेत सोमवती अमावास्येचे विशेष महत्व आहे. जेजुरीच्या खंडेरायाचे उपासक सोमवती अमावास्येला तळी भरतात आणि देवाची विशेष पूजा बांधली जाते.
दिव्याचे पूजन किंवा दिव्याची स्वच्छता हे बाह्य प्रतीक आहे. आपल्या मनातील आणि बुद्धीतील ऊर्जेचा, चैतन्याचा, ज्ञानाचा अखंड नंदादीप सतत तेजाळत रहावा आणि आपल्या प्रयत्नांचे इंधन त्यात पडून तो सतत प्रकाश देत रहावा अशी सदिच्छा या आषाढ अमावास्येला करूया.

ताम्हाणे वर्णन

 घरचे ओले काजू आणि बटाटा घातलेली झणझणीत भाजी आणि तांदळाची लुसलुशीत भाकरी असा घास डब्यातून घेत त्याने न्याहरी संपवली आणि अक्षरशःमोठ्ठी ढेकर ऐकू लागली. तृप्ततेची... 

आता त्याने मी दिलेला कोरा चहा घेतला...आलं, गवती चहाची पात, भरपूर साखर आणि चहाची पावडर घातलेला.. दूध नाही हं त्यात.. तो पिऊन त्याला आणखी तरतरी आली आणि तो उत्साहाने खालच्या मळीत काम करायला बाहेर पडला...
आज शहरात इतके रूग्ण नव्याने सापडले ... इतक्या जणांचा मृत्यू... कुणीतरी एक मुलगा कोरोनाग्रस्त अंध वडिलांना रूग्णालयात दाखल करतो आणि त्यांचे तिथे झालेले हाल माध्यमावर पोस्ट करतो तर कुणी विलगीकरण कक्षात आलेले चांगले अनुभव इतरांपर्यंत पोहोचवत असते...
कोकणातल्या एका खेड्यात बसून मी या दोन दृश्यांची एकाचवेळी साक्षीदार असते. पहिलं माझ्याच घरात घडतं आणि दुसरं मी फेसबुक, व्हाॅटस्अप, इ वृत्तपत्रे यावर वाचत, पहात असते.

रत्नागिरी जिल्हा,तालुका राजापूर येथील ताम्हाने हे छोटं गाव. वाड्या बारा. लोकसंख्या 2500 च्या आसपास.पूर्वी बरीच होती असं ग्रामस्थ सांगतात. पण नोकरीसाठी बरेचसे तरुण मुंबईला गेलेले असल्याने ही संख्या कमी झाली. शिमगा आणि गणपती या उत्सवासाठी हमखास चाकरमानी आपल्या कोकणातल्या घरी येतो.यावर्षीही शिमग्यासाठी चाकरमानी आले पण लाॅकडाऊनमुळे अडकले.लाॅकडाऊनमुळे मुंबईतल्या आपल्या लहानशा घरात राहणेही कठीण झाल्याने लाॅकडाऊनच्या दुसर्‍या तिसर्‍या टप्प्यात मिळेल त्या वाहनाने, असेल तितकी जास्तीची रक्कम देऊन मंडळी कोकणातल्या आपल्या घरी आली. यामुळे सध्या गावात हजारभर माणसांची भर नक्की पडलेलीआहे.
लाॅकडाऊन आणि कोरोना या परिस्थितीत कोकणातल्या या छोट्या खेड्यात माझ्याच घरात मी कुटुंबासह राहिले आणि मला जे दिसलं, जे आम्ही अनुभवलं ते इथे नोंदवते आहे. आम्ही सेंद्रीय शेती करतो इथे त्यामुळे आमच्याकडे मदतीसाठी स्थानिक सदस्य येतात. त्यांच्याशी झालेला संवाद, गावात फिरताना अनुभवलेली परिस्थिती, माझ्याकडे अभ्यासाला येणारी दोन वाड्यांमधील मुले यांच्यामुळे मला विविध कंगोरे टिपायची संधी मिळाली.त्याची ही थोडी मांडणी...

पुण्यात गुढीपाडव्याच्या दिवशी मंडईत उसळलेली गर्दी असो किंवा मुंबईत मरीन डाईव्हवर फिरणारे हौशी असोत... संसर्ग वाढतच राहिला. पण आमच्या गावात मुंबईहून आपापल्या जरी परतलेला चाकरमानी आणि त्यांची कुटुंब चौदा दिवस माळावरच्या गोठ्यात किंवा बंद असलेल्या आणि आता स्वच्छ करून कुटुंबानेच जागा उपलब्ध करून दिलेल्या घरात बंद होता.
"काय करणार ताई, माझीच जाव हाय. पण बशीतून उतरल्यावर मी तिला झरात पन घेतली नाय. तांब्या भांडा लांबच ठेवलीला नं मी... आपलीच मानसं हायती पन गावात आजार पसरंल मनून कालजी घेतलेली बरी नं!" माझी मदतनीस ताई मला आयुष्याचं तत्वज्ञान सांगत होती आणि मी तिच्याकडे आश्चर्याने पहात होते.
हे वास्तव सर्वदूर अनुभवाला येतं की ग्रामीण भागातील लोक हे अडाणी, गावठी, खेडूत म्हणून गणले जातात. शिक्षण कमी, संधी कमी, सुविधा कमी म्हणून शहराच्या तुलनेत मागे राहिलेला मोठा समाजगट गावांमधे हायला मिळतो. यांना काही स्वप्नं नाहीत, यांच्यात काही क्षमता नाहीत, यांना उज्वल भविष्य नाही म्हणून हिणवला जाणारा हा समाजगट शहरातल्या उच्चशिक्षितांनाही लाजवताना कोरोनाच्या काळात आम्ही अनुभवला.
यांच्याकडे दोन पायांची गाडी, थोडी सुबत्ता असली तर घरातल्या युवकाकडे एखादी बाईक आणि चारचाकी तशी विरळाच! दिवसभर शेतात, घरात, रानात राबणारा हा समाज कोरोनाच्या काळात सजग होता.आत्मनिर्भर होता हे माझं निरीक्षण आहे.कारण
मुंबईहून आलेल्या आपल्याच जिवलगांना यांनी स्वयंप्रेरणेने कोरोन्टाईन केलं. त्यांच्यासाठी पाणी, शिधा, चुलीसाठी फाटी, ताटं,भांडी अगदी टूथपेस्टसुद्धा अशा सगळ्या सोयी घराबाहेर उपलब्ध करून दिल्या.
लाॅकडाऊन जाहीर व्हायच्या आधी कडूवाडीतला प्रसिद्ध महिलांच्या लेझीमचा पालखीभोवतीचा नृत्याविष्कार सगळ्या गावाने अनुभवला. जसे शासकीय आदेश येऊ लागले तसे मात्र लोकांनी स्वयंप्रेरणेने पालखी आटपती घेतली. शेवटच्या दिवशी होत असलेले पूजेचे उपचार थोडक्यात आटपले आणि दुपारीच देवी मंदिरात नेऊन पुनःस्थापित केलीसुद्धा.दरवर्षी होणारी रोमटाची जत्राही झाली नाहीच अर्थात.
लाॅकडाऊन जाहीर झाल्याने मुंबईकर, पुणेकर गावातच अडकले. घराघरात दाटी झाली. पहिल्या एकवीस दिवसांच्या काळात एक अनामिक भीती मनात दाटली होती. अनिश्चितता.. आणि पुरवठा कसा होणार याची काळजी...
गावातलं किराणा मालाचं एकमेव दुकान आणि दुसरं रेशन दुकान, खाजगी केशकर्तनालय सर्व बंद होतं. लोकांनी दुसर्‍याच्या शेतात जाऊन करायची कामंही थांबवली होती.मुलं वाड्यावाड्यात एकत्र खेळत होती पण तरी तणाव दिसत होता.
कोरोनाचे नियम पाळा सांगणारी ग्रामपंचायतीची रीक्षा वाड्यावाड्यात फिरली. सरपंच आणि समिती सदस्य घरोघरी जात होते. रूग्णसेविका ताई माझी मैत्रीणच आहेत. दिवसभर त्या स्वतःआणि अंगणवाडी ताई घराघरात जात होत्या. एक शिक्का मारलेला माणूस फिरतो आहे गावभर ही तक्रार पंचायतीत त्याच्या कुटुंबियांनीच दिली!!!
वैद्यकीय यंत्रणा काम करत होती. शाळेतल्या शिक्षकांना पोलिसांचे सहाय्यक म्हणून ड्यूटीही लागली.
पण हे फार काळ नाही जाणवलं. आठवडाभराने लोक आपापल्या शेतातील कवळं तोडणे,भातलावणीसाठी जमिनीची पूर्वमशागत करणे, भाजावळ करणे अशी कामं करताना दिसू लागली.
किराणा मालाच्या दुकानापुढे चौकोन आखले गेले . एका भावाचा दूरभाष क्रमांक नोंदवला गेला. इथे यादी पाठवा आणि दुसर्‍या दिवशी आपली पिशवी घेऊन जा असे सुचविण्यात आले. दर आठवड्याला भाजीचा टेम्पो येऊ लागला. लोक मास्क बांधून, अंतर ठेऊन भाजी विकत घ्यायला जायचे. फळंही मिळायची अधूनमधून.आठवडी बाजार कटाक्षाने बंद होता. फक्त वैद्यकीय सेवा सुरु होत्या.
गवळी कुटुंबातून दूध पुरवठा होत होता त्यामुळे दुधाची सोय झाली होती.घरात खूप माणसे असल्याने जिथे वस्तू कमी पडतील तिथे त्या एकमेकांना दिल्या जात होत्या.
एक महिला म्हणून नजरेने टिपलेलं असं की मुंबई पुण्याहून आलेल्या नातलग महिला अंगणात खुर्च्या टाकून गप्पा मारत असत आणि कोकणातल्या घरी असलेली जाऊ, सासू, बहीण, नणंद मात्र विस्तारित कुटूंबासाठी राबत होत्या. त्या कुरबुरीही कानावर आल्या. पण लाॅकडाऊन वाढल्यावर मात्र या शहरातून आलेल्या महिलाही भाजी घ्यायला आलेल्या दिसू लागल्या. घरकामात मदतही करू लागल्या.
धान्य, भाजी नाही, मांसाहारी पदार्थ नाहीत पण लोकांनी अंडी खूपच वापरली आहारात. अंड्याचा टेम्पो आला की लोक पाच सहा डझन अंडी सहज नेत होते.परिस्थितीशी सामंजस्य दिसत होतं.
घरात साठवलेला वर्षभराचा तांदूळ, भाकरीसाठी नाचणी आणि पिठल्यासाठी कुळीथ आहेत वैनी. कशाला जाचं तडमडायला शेहेरात... काय नाय तर भात आणि पिठी (कुळीथाचं पिठलं) चुलीवर करून दोन वेळा खायाचं आणि गप बसायचं...
मी मात्र आज फ्लाॅवर नाही, आज टाॅमेटोच खराब अशी कुरकुर मनात करायला सुरूवात करतानाच शेजारच्या घाग वहिनींनी मला नकळत डोळ्यात अंजन घातलं. चार महिने मग मी ही आमच्या शेतातल्या चवळीच्या शेंगा, वांगी, दुधी याच भाज्या परतपरत वेगवेगळ्या पद्धतींनी करून पाहिल्या!!!उसळी केल्या आणि काहीच नसलं तर कांदे आणि बटाटे मिळत होतेच. सकाळी कांदा बटाटा, संध्याकाळी बटाटा कांदा.... पण काही अडलं नाही... पोट तृप्तीने भरत होतंच.
रोजी बंद म्हणून रोजंदारीवर काम करणारा वर्ग अस्वस्थ नक्कीच झाला. पण यावेळी मुंबईतले नातेवाईक मदतीला मिळाल्याने अनेकांनी मिळेल त्या सामानात घरांची डागडुजी केली, परिसर नीटनेटका केला एवढंच काय रात्री वहाळातून जाऊन छोट्या मोठ्या शिकारीही केल्या... गावात ते सहज घडतं... पावसाळ्यात तर मासे, चिंबोर्‍या पकडायला जाळी घेऊन अनेक जण आजही रात्री बाहेर पडतात... उद्याच्या कालवणाची सोय...
चाकरमानी मुंबईतील परिस्थिती पाहून बेचैन झाले. पण हस्तकौशल्याचे कसब या लोकांना जन्मजातच असते बहुधा. शांतपणे या सदस्यांनी गावात छोटी मोठी कामे मिळवून करायला सुरूवात केली. वेळही जातो आणि पैसेही मिळतात.
घरोघरची भातलावणी तर यावेळी लग्नघरासारखी पार पडलेली अनुभवायला मिळाली. शेतात पंचवीस तीस कुटुंबीय एकत्र दिसत होते." यावेळी मुंबईचा भाव आला ना कोरोनामुळे त्यामुळे लावणी कवाच उरकली... जास्त काय वाटला नाय काम... पोरोंनी मजाच केली लय..."
भाजीचा टेम्पो आला किंवा सौंदळच्या पंपावर उद्या पेट्रोल येणार आहे... पाचल हे आठवडी गाव आज उद्या सुरू असणार आहे अशा मदतीच्या बातम्याही पसरत होत्या.
गावाची पलंपरागत खोती ज्या कुटुंबाकडे आहे ते कुटुंबही अतिशय स्वस्थतेने नेहमीसारखं जगत होतं. त्यांचंच किराणामालाचा एकमेव दुकान आहे गावात. म्हणून व्यस्तता अधिक होती. पण नियम पालन करून धान्य मिळत होतं. घरातल्या महिला वेळच्यावेळी तुळशीपुढे दिवा लावताना, वाती वळताना, स्वयंपाक करताना अगदी नेहमीसारख्याच रमलेल्या होत्या.
गाव भरलं होतं त्यामुळे नेटवर्कवर ताण आला हे खरं. मात्र अधूनमधून नेटवर्क मिळत होतं.
आम्हाला खरंचच जाणवलं नाही की पुण्यात मुंबईत काय घडतय... नातलग, स्नेही सर्वांची चिंता वाटत होती पण शहरातल्या असुरक्षिततेची पुसटशी कल्पनाही आली नाही.
शरात राहिल्यामुळे गावातल्या घराशी, जीवनशैलीशी अपरिचित झालेले लोक मात्र ई पास काढून परतले. पण बहुतांशी मंडळी आता गणपतीपर्यत राहणार आहेतच. काही शिक्षित मुले शहरात कंपन्यांमधे कामाला आहेत त्यांना कामे सुरू झाल्याने परतावे लागले. पण ई पास काढून खास गाडी करून कुटुंबासह परतताना सर्वांनी दोन महिन्याचा सर्व शिधा, वाणसामान पोत्यात भरून भरून गाडीत कोंबला अक्षरशः!
हे सर्व वर्णन नोंदवताना मला आजही जाणवतय की आयुष्याकडून फार कमी अपेक्षा ही या ग्रामीण जीवनाची गुरुकिल्ली आहे! माझ्याकडे मुलं अभ्यासाला पाठवली पालकांनी यातूनहे ही स्पष्ट झालं की पालक आणि मुलं त्यांच्या भविष्याबाबत जागरूक आहेत. आपणही मोठं व्हावं असं मुलांनाही वाटतय. पण यांचं जगणं खरंच " आत्मनिर्भर" शब्दाला साजेसंच आहे.
चार पैसे कमी मिळाले किंवा आज आत्ता याक्षणी मला हवं ते मिळालं नाही म्हणून चिडचिड नाही.आहे त्या परिस्थितीत, निसर्गाशी जुळवून घेत ही माणसं जगत आहेत. आरोग्याच्या समस्या यांनीही आहेत. कौटुंबिक विवंचनाही आहेतच. माणूस म्हटलं की हे सगळं ओघाने येणार.
तरीही जे उपलब्ध झाले त्यात समाधान मानून गावात सगळ्यांनी आषाढी एकादशी साजरी केली. पाच जणांची छोटी दिंडी पुरेसे अंतर राखून विठ्ठल मंदिरात आली.आषाढ अमावास्याही गावात साजरी झाली आणि पंचमीला मातीचा नागोबाही घरोघरी पूजला गेला.
पावसाळ्याच्या सुरुवातीला एकमेकांच्या अंगण परसातल्या वेली झाडं छाटून आणली गेली आणि आपल्या अंगणात रूजवली गेली. मलाही गावातल्या एका आजींनीस्वतःहून अशी चार पाच रोपं दिली अंगणात लावायला!
तर हे सगळं मी अनुभवलं... माझ्या शहरी चष्म्यातून मी याकडे पाहिलं आहे हे अगदी नक्की! पण त्यामुळे मला समजली ग्रामीण आयुष्यातली आयुष्याकडे पाहण्याची सकारात्मकता. आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि "समाधान" हा सहसा मानवी आयुष्याच्या कोशात न सापडणारा शब्द मला यांच्या शब्दकोशात सापडला....
लाॅकडाऊनच्या काळात मी गावातल्या स्थानिकांच्या कुटुंबात नैराश्य पाहिलं नाही,आयुष्य संपलं की काय असा आविर्भावही कुणाचा दिसला नाही.
संपूर्ण जग हादरलेले असताना एक बारा वाड्यांचं छोटं गाव नांदतं आहे. यासारखी अनेक गावं भारतभर आहेत. तिथेही थोड्याफार फरकाने अशीच स्थिती असेल कदाचित. कोकणात ज्यांची नांदती घरं आहेत अशा आमच्या अनेक परिचितांचंही आयुष्य आम्ही लांबून पाहिलं, पण या काळात तेही गढूळलेलं दिसलं नाही.तणाव असला तरी समाधान जागतं होतं.
लाॅकडाऊनच्या काळात मोठमोठी शहरं उदासीनतेच्या छायेत आणि माणसं निराशेच्या गर्तेत जात असताना गावातली ही रंगीबेरंगी तुकड्यांनी विणलेली गोधडी कोरोनाच्या अनिश्चिततेच्या सावटातही मला ऊब देऊन गेली...



चिकू पिकू ब्लाॅग(गणेशोत्सव

 ज्ञान, कला आणि कौशल्याने साजरा करूया यावर्षीचा गणेशोत्सव...

डाॅ.आर्या जोशी

गणपती ही सर्वांची लाडकी देवता आहे. आपल्या लहानपणातही आपण उत्साहाने घरातला गणेशोत्सव साजरा केला आहे. आता आपण मोठे झाल्यावरही आपल्या पुढच्या आणि मागच्या दोन्ही पिढ्यांना सोबत घेऊन आपण हा उत्सव आनंदाने,उत्साहाने साजरा करतो.
ब्रह्मणस्पती ही वैदिक देवता आहे. ऋग्वेद या ग्रंथात ब्रह्मणस्पती नावाची देवता आणि तिचे सूक्त आहे. ही वाणीची देवता मानली गेली आहे. ब्रह्मणस्पती ही देवता सेनानायक म्हणूनही ओळखली जाते. तो सर्व गणांचा अधिपती म्हणजे प्रमुख आहे. याच ब्रह्मणस्पतीला पुराणकाळात " गणपती" हे नाव मिळाले. मुद्गल पुराण, गणेश पुराण अशा विविध पुराणांनी गणपती या देवतेचे वर्णन केले आहे. स्तुती केली आहे.
भारतीय संस्कृतीमधे महत्वाची ठरणारी प्राचीन मंदिरेही गणपतीच्या विविध रूपांमधील शिल्पांनी सजलेली आपल्याला दिसतात.कोणत्याही पूजेमधे गणपतीला प्रथम पूजेचा मान दिला जातो. गणपती ही ज्ञानाची, विद्येची, कलेची देवता आहे. त्याचजोडीने संकटे दूर करणारा म्हणूनही गणपती सर्वदूर प्रसिद्ध आहे.
अशा या गणपतीची पूजा आपण गणेशोत्सवात करतो.
ही पूजा म्हणजे मूळ "पार्थिव गणेश व्रत" आहे. श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी असे एक महिन्याचे हे गाणपत्य संप्रदायाचे व्रत आहे हे आपल्याला माहिती नसते.महिनाभर रोज नदीवर जाऊन अंघोळ करायची आणि नदीतल्या मातीचा आपल्या हाताच्या अंगठ्याएवढा गणपती तयार करायचा. त्याची पूजा करायची आणि लगेच नदीत विसर्जन करायचा असं पूर्ण महिनाभर करायचं. रोज नाही जमलं तर व्रताच्या शेवटच्या दिवशी तरी करावं असं काळाच्या ओघात घडत गेलं. त्यामुळे गाणपत्यांचं हे व्रत हळूहळू सर्वांनी स्विकारलं आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला आपण गणेशाची प्राणप्रतिष्ठा करतो.
राष्ट्रीय एकात्मतेसाठी आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी लोकमान्य टिळकांनी या व्रताला सार्वजनिक उत्सवाचं स्वरूप दिलं आणि समाज एकत्र केला.
गणपतीच्या पूजेमधे वापरली जाणारी २१प्रकारची पाने ही सुद्धा औषधी वनस्पतींचीच असतात. या ऋतूत या वनस्पती आजूबाजूला सहज उपलब्ध असतात. त्यामुळे त्या देवाला अर्पण करण्याची पद्धती रूढ असल्याचे दिसते. जाणत्या लोकांना या वनस्पतीच्या औषधी गुणधर्माचीही माहिती असते.
गणपती ही संघटनेची देवता आहे. जसे समाजाचे संघटन व्हायला हवे तसेच कुटुंबातही व्हायला हवे. यावर्षी घराबाहेर पडून गर्दी करून गोष्टी विकत आणण्यापेक्षा आपण घरातच काही संधी घेतली तर? कुटुंबाचेही संघटन आणि सर्वांचाच हातभार उत्सवाला लागेल.
गणेशोत्सव हा यावर्षी अधिक आनंददायी करण्यासाठी आपण पालक म्हणून काय करू शकतो? मुलंही सध्या कंटाळली आहेत आणि उत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या कौशल्यालाही वाव देता येईल.
१.गणपतीची मूर्ती विकत आणण्यापेक्षा छोटी गणेशमूर्ती घरी करून पाहता येईल.
२.गणपतीसाठी आवश्यक ती सजावट विकत आणण्यापेक्षा घरातील उपलब्ध साहित्यातच मुले आणि पालक मिळून सजावटीची तयारी घरातच करू शकतील.यासाठी काय Theme निवडायची याबद्दल मुलांना विचार करायची संधी देऊया.त्यांच्याशी बोलून संकल्पनेवर आधारित काही लिखाणही करता येऊ शकेल.
३.गणपतीच्या काळात गोड पदार्थ आवर्जून केले जातात.असे सोपे पदार्थ मुलांच्या सहभागातूनही करता येतील का? असा विचार करावा.
४.गणपतीच्या पूजेत वहायच्या पत्री विकत आणण्यापेक्षा आपल्या सोसायटीच्या आवारातच अशी काही झाडे आहेत का याचा शोध घेता येईल.
५.गणपतीच्या पूजेची तयारी ही पण एक छान गोष्ट असते. मुलांना जर विश्वासात घेऊन काही गोष्टी काळजीपूर्वक हाताळायला दिल्या तर मुले या तयारीतही आनंदाने सहभागी होतील.
६.घरी पाहुणा म्हणून आलेल्या देवाचे रंजन करण्याची पद्धतीही प्रचलित आहे. त्यामुळेचआपण आपल्या सोसायटीतही विविध गुणदर्शन कार्यक्रमात गणेशोत्सवात सहभागी होतो. यावर्षी तसे करता येणार नसले तरी आपल्या घरी पाहुणा म्हणून आलेल्या लाडक्या बाप्पाचे मनोरंजन करण्यासाठी आपण घरातल्या घरातच असे कार्यक्रम बसवू शकतो. पालक आणि मुले मिळून अशी छान गंमत करता येऊ शकेल.
७.गणेशोत्सवाच्या काळात गणपतीसाठी प्रसिद्ध जगभरातील स्थाने, मंदिरे, कथा, रंजक माहिती अशी विविध माध्यमांवरून एकत्र करून त्याचा छान संग्रह मुले करू शकतील.
यावर्षीचा गणेशोत्सव कलेने, कौशल्याने आणि ज्ञानाने पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करूया का? ज्या देवतेची पूजा करायची, उत्सव करायचा त्याला आपली अशी कृतीशील पूजा मनोभावे अर्पण करूयात का?
तुम्ही काय केले ते आम्हालाही नक्की कळवा बरं का...


गणेशचतुर्थी

 गाणपत्य संप्रदायाचे उपास्य दैवत म्हणजे श्रीगणपती. गणेश पुराण, मुद्गलपुराण या पुराणांनी गणेशाचे महात्म्य सांगितले आहे.

ऋग्वेदातील ब्रह्मणस्पती ही देवता.या देवतेचे ब्रह्मणस्पती सूक्तही ऋग्वेदात आहे. ओं गणानां त्वा गणपतिं हवामहे।या मंत्रामधे म्हटले आहे त्याप्रमाणे ब्रह्मन म्हणजे वाणीची देवता आणि गणांचाही अधिपती म्हणजे ब्रह्मणस्पती. पुराणकाळातील गणपती हे ब्रह्मणस्पती या देवतेचेच विकसित रूप आहे.

भाद्रपद शुक्ल चतुर्थीला महासिद्धिविनायकी चतुर्थी किंवा शिवा म्हणतात. या दिवशी आपण श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा करतो आणि पूजन करतो.या व्रताला " पार्थिव गणेश व्रत" असे नाव आहे.
सर्व चराचरात भरून राहिलेले ईश्वरी तत्व वंदनीय आहेच. पण सर्वसामान्य भक्तीला ईश्वराप्रती कृतज्ञता अर्पण करण्यासाठी त्या ईश्वराचे सगुण साकार रूप हवे असते. हत्तीचे मुख आणि मानवी शरीर असलेला गणपती हा मूर्तीरूपात आपल्यासमोर येतो आणि आपण त्याच्यात प्राण फुंकतो, आपल्यातले चैतन्य प्रक्षेपित करतो.
सुपाएवढे कान बहुश्रुतता शिकवतात, बारीक डोळे लांबचे पाहण्याचा म्हणजेच भविष्याचा वेध घ्यायला शिकवतात. उंदीर हा अज्ञानाचे प्रतीक आणि गणपती ही ज्ञानाची , विद्येची , कलेची देवता. ज्ञानाने अज्ञानाला पायाखाली धरले आहे म्हणजेच त्यावर मात केली आहे असाही एक विचार यामागे आहे. आपापल्या कुटुंबातील पद्धतीनुसार दीड, पाच,सात, दहा दिवस पूजन करतो. काही कुटुंबात हे व्रत वर्षभराचे सुद्धा असते.
पूजेमधे आपण देवतेला आवाहन करतो.गंध, अक्षता, फुले, कापसाची वस्रे, यज्ञोपवीत वाहून पूजन करतो.अथर्वशीर्षाचा अभिषेक करतो.आयुर्वेदाने महत्व सांगितलेल्या उत्तम द्रव्यांचे मिश्रण असे पंचामृत अर्पण करतो. निसर्गात या दिवसात सहज उपलब्ध असलेल्या एकवीस औषधी पत्री, वेगवेगळी फुले, थंड गुणधर्माच्या दूर्वा गणपतीला अर्पण करून निसर्गाशीही जवळीक साधतो.
मोद म्हणजे आनंद देणारे उत्तमोत्तम पदार्थ देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करतो.अनेक कुटुंबांमधे देवाचे रंजन करण्याची प्रथा आहे. त्यानुसार गायन, वादन, नृत्य अशा कलांची सेवाही गणेशाचरणी रूजू होते.

शरीर- मन- बुद्धीला स्थिरता देणारे गणेश अथर्वशीर्ष गणपतीच्या उपासनेत महत्वाचे ठरते. अथर्वण ऋषींनी लिहीलेले हे एक उपनिषदच आहे. गुरुंच्या जवळ बसून गणेशाच्या तात्विक रूपाचे चिंतन करणे, त्याचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच अथर्वशीर्षाचे पठण करणे.
गणपती हा सेनानयक. संघटनेचा अधिपती. लोकमान्य टिळकांनी या देवतेच्या या वैशिष्ट्यांचा आधार घेत स्वातंत्र्य चळवळीसाठी समाजाला एकत्र करण्यासाठी श्रीगणेशाकडेच नेतृत्व सोपविले आणि दहा दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. आजही सामाजिक एकत्रीकरणासाठी, समाज प्रबोधनासाठी गणेशोत्सव हे महत्वाचे माध्यम ठरले आहे.(कोरोना महामारीच्या या वर्षीच्या काळाचा विचार करता सामाजिक अंतर राखणे अधिक उपयुक्त ठरेल.)
गाणपत्य संप्रदायाच्या जोडीनेच देवी उपासना म्हणजेच शाक्त संप्रदायाची उपासना भारतीय धर्म संस्कृतीत महत्वाची आहे.
व्रत- वैकल्यांनी माणसाचे व्यक्तिमत्व समृद्ध करण्याचा प्रयत्न धर्मशास्रकारांनी केलेला दिसतो. ज्येष्ठागौरी पूजन हे असेच एक व्रत. अनुराधा नक्षत्रावर आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन असेहे व्रत आहे.गौरी म्हणजे अनाघ्रात पृथ्वी.या दिवसात सभोवती फुललेल्या तेरड्याच्या फुलांना सुद्धा गौरी म्हणून पूजले जाते. मुखवट्यांच्या गौरी,खड्यांच्या गौरी, तांब्यावर मुखवटा रेखून केलेल्या गौरी असे वैविध्यपूर्णप्रकार गौरीपूजनासाठी पहायला मिळतात. प्रांताप्रांतानुसार आणि कुळाचारानुसार त्यात फरकही दिसतो. माहेरवाशिणी म्हणून आलेल्या गौरींचे विशेष कौतुक होते. विविध प्रकारचे नैवेद्य, आरती,सजावट, पोशाख - दागिने यांनी गौरींचे पूजन केले जाते. गौरी आगमनाने घरात समृद्धी नांदावी, दूधदुभते उदंड असावे,धान्याची राशींनी कोठार भरून जावे अशी प्रार्थना केली जाते. सुवासिनींना बोलावून हळदीकुंकूही केले जाते. महिलांना एकत्र आणणारे आणि त्याच्या कला कौशल्यांना वाव देणारे हे एक सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक असे व्यासपीठच आहे.
समाजमन जोडणारे, माणसाच्या धार्मिक भावनांना व्यक्त होण्यासाठी अधिष्ठान देणारे असे हे उत्सव. सर्वांनी ईश्वराचे मांगल्य! पावित्र्य सांभाळून या व्रतांचा आनंद घ्यावा आणि द्यावीही.
गणपतीबाप्पा मोरया!

छोट्यांचा बाप्पा

 हा बाप्पा तुमच्याशी नक्कीच बोलणार आहे. तुमच्या सहवासात त्याला खूप खूप खूपपप आनंद होणार आहे. मात्र यासाठी पुढील अटी लागू आहेत हं.....

* तुम्हाला गणपती हा देव नसून तो आपला मित्र आहे असे वाटणे सर्वात महत्वाचे आहे.
* गणपतीची मूर्ती बुक करायला गेल्यावर घरच्यांना जो आवडला त्यापेक्षा भलताच गणपती तुम्हाला आवडणे आवश्यक आहे.
* मूर्ती घरी आणल्यावर किमान दहावेळा तरी त्या मूर्तीवरचा रूमाल काढून पाहण्याची गरज तुम्हाला वाटली पाहिजे.हे कुणी पाहिलेच तर आपल्या दंडाला किंवा कोपराला धरून खसकन् ओढून तिथून कुणीतरी तुम्हाला ओरडून बाजूला केले पाहिजे.
* केलेले डेकोरेशन नीट झालेले आहे ना याची सतत तुम्ही काळजी घ्यायला हवी आणि त्या चिंतेपायी तुम्ही त्यात काही अनावश्यक बदल केले पाहिजेत.
* घरातला नैवेद्य तुम्हालाच करायचा आहे अशा थाटात आईच्या अलार्मबरोबर तुम्हीही उठणे गरजेचे आहे. सोवळे नेसलेले बाबा किंवा आजोबा आणि नैवेद्यात आई आजी गर्क असतानाच तुम्हाला निसर्गाच्या हाकेला ओ द्यावीशी वाटण्याची अत्यंत तातडी निर्माण झाली पाहिजे.
*बोर्नव्हिटा घातलेले दूध आणि त्यानंतर खिचडी खाल्ल्यावर तुम्हाला पेंग येणे आणि तुम्ही सोफा किंवा गादीत लोळत पडणे आवश्यक आहे.
*अंघोळ झाल्यावर घातलेले कपडे पुढच्या काही मिनिटांतच तुम्हाला टोचू लाजले पाहिजेत, खाज येऊ लागली पाहिजे आणि हे कपडे बटणे तडातडा ओढून किंवा जमेल तसे ताणून अंगातून काढता आले पाहिजेत.ते तसेच फेकूनही देणे अपेक्षित. कपाटातला तुमच्या आवडीचा डोरा किंवा फ्रोजन नाहीतर स्पायडरमॅन विराजमान असलेला पोशाख घालुन तो गणपतीला दाखवण्याची तुमची हौस दांडगी असली पाहिजे.
* तुम्हालाही पूजा करावीशी वाटली पाहिजे आणि पूजेची सामग्री सांडणे,पाडणे तुम्हाला लीलया जमले पाहिजे.
* समोर ठेवलेल्या तीन चार रंगीत पुठ्ठ्यांच्या खोक्यातल्या खाऊची वाट पाहणे आणि जमल्यास नैवेद्य दाखवण्याआधीच तुम्ही एखादी वडी, बर्फी, पेढा उचलून कुणाला कळण्याच्या आतच तुमच्या तोंडातही गेला पाहिजे. त्यातलाच एक माव्याचा मोदक गणपतीच्या डाव्या तळहातावर ठेवण्याची जबरदस्त इच्छा तुमच्यात असायला हवी हं!
नातेवाईकांचा फोन आल्यावर """हो हो बसला नं गणपती"" अशा चर्चा ऐकताना पाटावर गणपती आधीच "" बसलेलाच होता नं"" मग आता परत कुठे जाऊन """ बसला""" असा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे
*किमान जयदेव जयदेव ध्रुवपद म्हणता आले पाहिजेच. आरती आली नाही तरी मोठ्यांच्या ओठांच्या हालचाली टीपत तुम्हीपण नवी आरती रचणे आवश्यक आहे.
झांजा वाजवता येणे आणि त्याही कोणताही ताल नसलेल्या "तालात""हे ही अनिवार्यच.
*अथल्वशील्श म्हणता येतं मला... पण ते ब्लम भूललल बूवश्वलोम असं म्हणणे किंवा कदाचित नीट छान शुद्ध म्हणणे पण फलश्रुतीत गडबड होणे ही आवश्यक.
अगदी हे सर्व नाही जमलेच तर " "" गंपटीबाप्पा मोलया...मंग्गमूत्ती मोलया.... तरी यायला हवे म्हणजे हवेच.
हे ज्यांना येईल त्यांचा हा बाप्पा त्यांना खूप खूप आनंद देवो!!!!!

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...