Sunday, 30 March 2025

तुझी -माझी चैत्रगौरी

आयुष्यातल्या असंख्य चढ-ऊतारांच्या झळा सोसून जीवाची काहिली झालेली ती...कितीही झालं तरी भूतकाळ-वर्तमानकाळ-भविष्यकाळ अशा तीन टप्प्यांमधे झुलणारा तिचा झोका, तिच्या मनातले असंख्य आवर्त,सुख दुःखांच्या फेर्‍या,मनातलं फारसं कुणापाशी बोलता न येणारं सासर आणि म्हणूनच मनातला हळवा कोपरा माहेर! 
ग्रीष्माच्या साथीने ती येते,भाद्रपदातही ती येते! पण भाद्रपदातला तिचा पाहुणचार अगदीच तीन दिवसांचा! अनुराधा,ज्येष्ठा व मूळ नक्षत्रांवरचा! पण चैत्र पांघरून ती येते महिनाभर! मागचे सारे पाश मागेच सोडून आयुष्यातली काहिली सुसह्य करायला माहेर तिला बसवतं झोक्यावर! कपाळी थंडगार चंदनी टिळा! आज्ञाचक्र ऊर्जित करणारा! 
निसर्ग भरभरून देत असतो कैर्‍या,आंबे,कलिंगडं,ऊस आणि बरंच काही! सारं सारं तिच्या पाहुणचाराला साजेसं!
सारं थंडावा देणारं,शीतलता देणारं! 
चटकदार कैरी चिरता चिरता कधी तोंडात टाकून पहावीशी वाटली तरी भरल्या घरातल्या सासवा,जावा,नणंदा हटकुन काहीतरी म्हणणारच! मग ही हौस पुरवायची माहेरी यथेच्छ! झोपाळ्यावर बसायला आता काय परकरी पोर आहेस का? असं म्हणत तिचं प्रौढत्व तिला आठवून देणारा तो काळ! मग ये माहेरी आणि घे वारा झूलतानाचा!कुण्णी काही म्हणणार नाही तुला!
कैलास पर्वतावर काय चाललं आहे हे पाहू देत त्यांचं त्यांना! त्यातून तिची दोन्ही लेकरं म्हणजे वल्लीच आणि पती परमेश्वरांचं काही विचारू नका! मनात असेल तर बसतील सारीपाटाला नाहीतर आहेच तिसरा डोळा उघडलेला! आणि त्यांची सारी प्रजा आणि सैन्य! सार्‍यांची काळजी वहात ती बसलेली असतेच सदासर्वकाळ! मग तिलाही विश्रांती!
मग ती पौराणिक साहित्यातली देवी असो मध्ययुगातल्या अगदी परवापर्यंतच्या एकत्र कुटुंबातली सासुरवाशीण! कुणालाच चुकलं नाही हे! मग तिने आनंद कुठे शोधावा?
तो असा चैत्रात! शेणाने सारवलेलं चैत्रांगणाने सजलेलं संस्कृतीचं पावित्र्य पहात पहात तिने डोलावं! सुवासिनींच्या हास्यविनोदात रमावं! समोर मांडलेल्या डाळ पन्ह्यात आणि सजावटीत तृप्त व्हावं आणि अक्षय्य समृद्धीचं पात्र आपल्या माहेराच्या ओंजळीत अलगद रीतं करून वैशाखात स्वगृही परत जावं! पुन्हा तो वैशाख वणवा वाट पाहत असतोच! पण त्यावर आता ती मात करेल कारण चैत्रातला हा गारवा तिने लपेटला आहे! त्याचा थंडावा सरेल न सरेल तोच येईल वर्षा..... झडझडून पुन्हा सर्जन आणि वर्षन घेऊन!
आपण आणि ती वेगळे नाही आहोत! हे अद्वैतच आहे हे ध्यानी आलं की मग हे सारे उपचारही तिच्यासाठी नसून माझ्यासाठीच होतात! आणि माझ्या मनातला चैत्र हसतो,बहरतो,खुलतो...
©आर्या जोशी

Tuesday, 11 March 2025

त्वं मे सहव्रता भव।

 या विवाहाच्या निमित्ताने पुनः पुनः व्यक्त व्हावंसं वाटतं आहे कारण संस्कृतीचा आदर ओतप्रोत दिसतो आहे.

विवाह कशासाठी? कोणासाठी? त्यातले विधी असेच का आहेत? याबद्दल जर सारासार विचार केला तर दिसून येतं की गृहस्थाश्रम हा कायमच समाजव्यवस्थेचा कणा मानला गेला आहे.गृहस्थ आणि गृहिणीने त्यांच्या वैयक्तिक विषयसुखांचा आनंद घेतानाही एकमेकांची मर्यादा राखत संसार पूढे न्यायचा आहे.

वैदिक परंपरेत सूर्यासावित्रीचे विवाहसूक्त खूप बोलके आहे.त्याचा अभ्यास आजच्या काळातील युवतींनीही करण्यासारखा आहे.

गृह्यसूत्रांमधे तर प्रथम समागमाचा विधीही सुंदर पद्धतीने मांडलेला आहे आणि त्याला मंत्रांची जोड दिलेली आहे कारण अपत्य जन्माला घालणे हे पती पत्नीचे कर्तव्य आहे आणि एक भावी नागरिक त्यातून राष्ट्राला द्यायचा आहे.

कोणताही ग्रंथ जेव्हा एखाद्या विषयावर काही मांडणी करतो तेव्हा केवळ हे काहीतरी मागास आहे अशा दृष्टीकोनातून त्याकडे पाहणे संकुचित ठरेल.पण बहुधा तसेच होताना दिसते! कारण याबद्दल फारशी माहिती नसते.

भारतावरील आक्रमणे लक्षात घेता येथील सामाजिक व सर्वात आधी कौटुंबिक परिस्थितीवर घाला घातला गेला.मंदिरे उध्वस्त झाली तशा महिलाही उध्वस्त झाल्या.या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी लहान वयात होणारा त्यांचा उपनयन विधी बंद करून विवाह हाच त्यांचा उपनयनसंज्ञक विधी मानावा असं स्मृतिकारांना म्हणावं लागलं तर ते गैर नसावं त्या काळाच्या दृष्टीने.मग पती हाच गुरु म्हणून त्याला वंदन करण्याची,आदर देण्याची पद्धती! (मी दरवर्षी गुरुपौर्णिमेला माझ्या नवर्‍याला नमस्कार करते वाकून ! कारण intimate relationship मधेही mentorship होऊ शकते आजच्या भाषेत याचं आम्ही उदाहरण आहोत असं मला नेहमी वाटतं! माझ्या मनातलं उंचीच भय काढून टाकून मला थेट हिमालयात गिरीभ्रमणाला नेणारा माझा मित्र जेव्हा माझा नवरा होतो म्हणून त्यातलं गुरुतत्व बाधित होत नाही उलट ते वाढतं! आणि तो ही सांगतोच की मी आर्याकडून या चार गोष्टी शिकलो! मला असं नाही वाटत की मीच का त्याला नमस्कार करायचा! समानता आहे नं! कारण कृती ही फक्त प्रतीकरूप आहे आणि त्यामागचा भाव महत्वाचा आहे.आणि त्यातून मी वयाने त्याच्यापेक्षा थोडीतरी लहान आहेच! पण तरीही कयतींनाही अर्थ आहे म्हणून विधीतील उपचार सांगोपांगी महत्वाचे आहेत!

पण याच स्मृतिकारांनी स्रीलाही पूज्य मानण्याविषयी सांगितलं आहे कारण त्यांनाही दिसत असावंच नं की युद्धामुळे,आजारांमुळे ज्यांचे पती गेले आहेत अशा विधवांची काय अवस्था होत असावी! म्हणूनच की काय पुढच्या काळात अविधवा नवमी श्राद्ध केलं जाऊ लागलं! अशा परिस्थितीत जिचा पती सुखरूप तिचा भाग्योदय कारण समाज आणि कुटुंबरचनाही विधवांसाठी अवहेलनेचीच ठरली!

मधल्या काळात विवाह संस्कारात मुलीचे कन्यादान याच्याशी संबंधित तिचे श्राद्ध करण्याचीही पद्धती प्रचलित असल्याचे दाखले सापडले आहेत.काही महिलांकडून मी माझ्या Ph.D च्या वेळी तसे अनुभवही ऐकले आहेत सर्वेक्षणावेळी! दुर्दैवाने या प्रथा अधिक जोमाने फोफावल्या व रूजल्या आणि त्यामुळे विवाह संस्कारविधी विचारातील गर्भितार्थ मागे पडत गेला.सारं काही फक्त वरासाठी व फक्त वधूसाठी असं नाही आहे यात कारण आता आपण दोन शरीरे पण एक आत्मा असंच रहायचं आहे नं यापुढे! हा उदात्त विचार स्वीकारायला काय अडचण असू शकेल?कारण त्यामुळे कुटुंब,समाज आणि राष्ट्र बांधलं जातं आहे हे किती महत्वाचं आहे!

सातच पावलं का? आठवं का नाही? चारच का नाही? हे प्रश्न मला फुकाचे वाटतात.ज्यावेळी या रचना बांधल्या गेल्या आहेत त्यावेळच्या परिस्थितीनुसार हे सारं ग्रथित झालं आहे! आणि त्यात जर सहजीवनाचं सार बांधलं जात असेल सर्वार्थाने तर ते जसंच्या तसं स्वीकारण्यात नेमकी अडचण कुठे आहे?

मंगलसूत्र बंधन कारण ही कुणाची तरी विवाहित स्री आहे हे समजावं! ते बंधन समाजदृष्ट्या महत्वाचं आहे.आजही अनेक घटस्फोटीत किंवा विधवा महिला मंगळसूत्र आवर्जून घालतात कारण आता तर समाजाची परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे.

सौभाग्यवती या शब्दाचा विवाहित स्री हा अर्थ संकुचितपणे घेऊ नये.भग शब्दाचे विविध अर्थ आपल्याला कौशसाहित्यात सापडतात.भगवान असं आपण म्हणतोच नं परमेश्वराला! भग म्हणजे ऐश्वर्य,समृद्धी,शील असे विविध अर्थ! या सार्‍यांनी युक्त सहजीवन नववधूला मिळावे या आशीर्वादात केवढा मोठा अर्थ दडलेला आहे!

तर काय हा सारा विषय मुळातून समजून घेण्याची गरज आहे. लिहिण्यासारखं खूप आहे पण संशोधकालाही मर्यादा असतात कारण सारंच संशोधन लेखाच्या स्वरूपात खुलं करणं थोडं अवघड जातं!

जे आकर्षक वाटेल ते स्वीकारण्याकडे लहान मुलांचाही कल स्वभावतःच असतो.पण सज्ञानांनी मात्र गोष्टी तावून सुलाखून व परंपरेचा आदर करीत निष्पक्षपातीपणे समजून घ्यायला हव्या व नंतर त्यावर चर्चा करुन मार्ग काढायला हवा आहे कारण धर्मशास्रज्ञ हा विषय कधीही थेट तुम्हाला काही सांगणार नाहीत,त्याचे between the lines शोधण्याचा Wisdom सुद्धा आपली हीच भारतीय संस्कृती आपल्याला प्रदान करते!

डाॅ.आर्या जोशी



त्वं मे सहव्रता भव।

या विवाहाच्या निमित्ताने पुनः पुनः व्यक्त व्हावंसं वाटतं आहे कारण संस्कृतीचा आदर ओतप्रोत दिसतो आहे.
विवाह कशासाठी? कोणासाठी? त्यातले विधी असेच का आहेत? याबद्दल जर सारासार विचार केला तर दिसून येतं की गृहस्थाश्रम हा कायमच समाजव्यवस्थेचा कणा मानला गेला आहे.गृहस्थ आणि गृहिणीने त्यांच्या वैयक्तिक विषयसुखांचा आनंद घेतानाही एकमेकांची मर्यादा राखत संसार पूढे न्यायचा आहे.
वैदिक परंपरेत सूर्यासावित्रीचे विवाहसूक्त खूप बोलके आहे.त्याचा अभ्यास आजच्या काळातील युवतींनीही करण्यासारखा आहे.
गृह्यसूत्रांमधे तर प्रथम समागमाचा विधीही सुंदर पद्धतीने मांडलेला आहे आणि त्याला मंत्रांची जोड दिलेली आहे कारण अपत्य जन्माला घालणे हे पती पत्नीचे कर्तव्य आहे आणि एक भावी नागरिक त्यातून राष्ट्राला द्यायचा आहे.
कोणताही ग्रंथ जेव्हा एखाद्या विषयावर काही मांडणी करतो तेव्हा केवळ हे काहीतरी मागास आहे अशा दृष्टीकोनातून त्याकडे पाहणे संकुचित ठरेल.पण बहुधा तसेच होताना दिसते! कारण याबद्दल फारशी माहिती नसते.
भारतावरील आक्रमणे लक्षात घेता येथील सामाजिक व सर्वात आधी कौटुंबिक परिस्थितीवर घाला घातला गेला.मंदिरे उध्वस्त झाली तशा महिलाही उध्वस्त झाल्या.या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी लहान वयात होणारा त्यांचा उपनयन विधी बंद करून विवाह हाच त्यांचा उपनयनसंज्ञक विधी मानावा असं स्मृतिकारांना म्हणावं लागलं तर ते गैर नसावं त्या काळाच्या दृष्टीने.मग पती हाच गुरु म्हणून त्याला वंदन करण्याची,आदर देण्याची पद्धती! (मी दरवर्षी गुरुपौर्णिमेला माझ्या नवर्‍याला नमस्कार करते वाकून ! कारण intimate relationship मधेही mentorship होऊ शकते आजच्या भाषेत याचं आम्ही उदाहरण आहोत असं मला नेहमी वाटतं! माझ्या मनातलं उंचीच भय काढून टाकून मला थेट हिमालयात गिरीभ्रमणाला नेणारा माझा मित्र जेव्हा माझा नवरा होतो म्हणून त्यातलं गुरुतत्व बाधित होत नाही उलट ते वाढतं! आणि तो ही सांगतोच की मी आर्याकडून या चार गोष्टी शिकलो! मला असं नाही वाटत की मीच का त्याला नमस्कार करायचा! समानता आहे नं! कारण कृती ही फक्त प्रतीकरूप आहे आणि त्यामागचा भाव महत्वाचा आहे.आणि त्यातून मी वयाने त्याच्यापेक्षा थोडीतरी लहान आहेच! पण तरीही कयतींनाही अर्थ आहे म्हणून विधीतील उपचार सांगोपांगी महत्वाचे आहेत!
पण याच स्मृतिकारांनी स्रीलाही पूज्य मानण्याविषयी सांगितलं आहे कारण त्यांनाही दिसत असावंच नं की युद्धामुळे,आजारांमुळे ज्यांचे पती गेले आहेत अशा विधवांची काय अवस्था होत असावी! म्हणूनच की काय पुढच्या काळात अविधवा नवमी श्राद्ध केलं जाऊ लागलं! अशा परिस्थितीत जिचा पती सुखरूप तिचा भाग्योदय कारण समाज आणि कुटुंबरचनाही विधवांसाठी अवहेलनेचीच ठरली!
मधल्या काळात विवाह संस्कारात मुलीचे कन्यादान याच्याशी संबंधित तिचे श्राद्ध करण्याचीही पद्धती प्रचलित असल्याचे दाखले सापडले आहेत.काही महिलांकडून मी माझ्या Ph.D च्या वेळी तसे अनुभवही ऐकले आहेत सर्वेक्षणावेळी! दुर्दैवाने या प्रथा अधिक जोमाने फोफावल्या व रूजल्या आणि त्यामुळे विवाह संस्कारविधी विचारातील गर्भितार्थ मागे पडत गेला.सारं काही फक्त वरासाठी व फक्त वधूसाठी असं नाही आहे यात कारण आता आपण दोन शरीरे पण एक आत्मा असंच रहायचं आहे नं यापुढे! हा उदात्त विचार स्वीकारायला काय अडचण असू शकेल?कारण त्यामुळे कुटुंब,समाज आणि राष्ट्र बांधलं जातं आहे हे किती महत्वाचं आहे!
सातच पावलं का? आठवं का नाही? चारच का नाही? हे प्रश्न मला फुकाचे वाटतात.ज्यावेळी या रचना बांधल्या गेल्या आहेत त्यावेळच्या परिस्थितीनुसार हे सारं ग्रथित झालं आहे! आणि त्यात जर सहजीवनाचं सार बांधलं जात असेल सर्वार्थाने तर ते जसंच्या तसं स्वीकारण्यात नेमकी अडचण कुठे आहे?
मंगलसूत्र बंधन कारण ही कुणाची तरी विवाहित स्री आहे हे समजावं! ते बंधन समाजदृष्ट्या महत्वाचं आहे.आजही अनेक घटस्फोटीत किंवा विधवा महिला मंगळसूत्र आवर्जून घालतात कारण आता तर समाजाची परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे.
सौभाग्यवती या शब्दाचा विवाहित स्री हा अर्थ संकुचितपणे घेऊ नये.भग शब्दाचे विविध अर्थ आपल्याला कौशसाहित्यात सापडतात.भगवान असं आपण म्हणतोच नं परमेश्वराला! भग म्हणजे ऐश्वर्य,समृद्धी,शील असे विविध अर्थ! या सार्‍यांनी युक्त सहजीवन नववधूला मिळावे या आशीर्वादात केवढा मोठा अर्थ दडलेला आहे!
तर काय हा सारा विषय मुळातून समजून घेण्याची गरज आहे. लिहिण्यासारखं खूप आहे पण संशोधकालाही मर्यादा असतात कारण सारंच संशोधन लेखाच्या स्वरूपात खुलं करणं थोडं अवघड जातं!
जे आकर्षक वाटेल ते स्वीकारण्याकडे लहान मुलांचाही कल स्वभावतःच असतो.पण सज्ञानांनी मात्र गोष्टी तावून सुलाखून व परंपरेचा आदर करीत निष्पक्षपातीपणे समजून घ्यायला हव्या व नंतर त्यावर चर्चा करुन मार्ग काढायला हवा आहे कारण धर्मशास्रज्ञ हा विषय कधीही थेट तुम्हाला काही सांगणार नाहीत,त्याचे between the lines शोधण्याचा Wisdom सुद्धा आपली हीच भारतीय संस्कृती आपल्याला प्रदान करते!
डाॅ.आर्या जोशी

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...