Thursday, 19 March 2020

ताम्हाण्यातला शिमगा

नेहमी आपलं गार्‍हाणं देवाला सांगायला भक्त देवळात जातो पण या सणाला मात्र देव प्रत्येकाच्या घराघरात जाऊन भक्ताची चौकशी करतो. भक्त आणि भगवंत यातला हा आत्मीय संवाद अनुभवायचा तर कोकणातल्या कोणत्या तरी एका खेड्यात शिमगोत्सवाला नक्की भेट द्यायला हवीच!
कोकणातल्या आमच्या गावच्या वाड्या बारा! त्यातल्या एका वाडीची ब्रिटीश काळातली जुनी हकीकत आहे,नक्की काय ते कुणालाच माहिती नाही पण या वाडीत देवाची पालखी जात नाही हे मात्र जुने जाणते गावकरी सांगतात. या वाडीचा अपवाद सोडला तर बाकी प्रत्येक वाडीत घरी देवीची पालखी वाजतगाजत जाते!
नोकरीधंद्यानिमित्त गावाबाहेर गेलेले कुटुंबीयही या उत्सवाला आवर्जून आपल्या मूळ घरी येतात.
फाल्गुन पौर्णिमेला होळीच्या मांडावर होम लावला जातो. मांड म्हणजे असा चौथरा जिथे रोज रात्री पालखी विसाव्याला येते.देवळातून पंधरा दिवस बाहेर पडलेले देवी देवता सोन्याने मढून गावात फिरतात,भक्तांना भेटून थकतात आणि भक्तांच्या सुरक्षित छायेत मांडावर रात्री विसावा घेतात! जसा मी तसा माझा देव... नाही का??
होळीच्या दिवशी मानकरी खोतांच्या घरी प्रथम पालखी जाते. शेणाने सारवलेलं ,रांगोळीच्या बोटांनी भरलेलं अंगण,अबोली,सुरंगीने सजलेले हार असा सगळा थाट! बाहेरच्या पडवीत किंवा ओसरीवर नक्षीदार गालिचा,त्याशेजारी तेवती समई देवीच्या स्वागताला सज्ज असते.दाराला तोरण, कमानी,कनाती यांनी मांगल्य आणखीनच वाढतं!
रोज शेतात,बैलजोडीच्या साथीने राबलेले हात आज कांकणं भरून पावतात! नाकात नथ,अंबाड्यावर वेणी,नाकात नथ,अशी धनीण सजते. रोजच्या मळक्या मातीतल्या कपड्यातला घरधनीसुद्धा आज ओळखू येत नाहीत आपल्याला! लेकराबाळींचं तर विचारूच नका काही!
घराघरात गुळाच्या ढेपी येऊन पडतात! पालखीसोबत येणारा गावकर आणि भक्तांना प्रसाद वाटण्यासाठी हागूळ असतो! पालखी आपल्या वाडीत यायच्या आदल्या दिवशी स्वयंपाकाची तयारी होते.चूली सारवल्या जातात.कुंकवाची बोटं रेखली जातात.
मांडावरही लगबग असतेच! होलदेव नावाचा पाषाणाचा देव गुरवाकडून रोज पूजला जातो. मांडावरच्या बहरू लागलेल्या चाफ्यानेच तोही शोभून दिसतो!
सकाळी मांडावर ओट्या भरल्या जातात.कुणाचा नवस पूर्ण झाला तर त्याचं कथन गुरव देवाला करतो. कुणी नवा नवस बोलतो. कुणी नारळ देतं कुणी काही! तर तेही देवाला सांगितलं जातं. सुखा समाधानाची प्रार्थना केली जाते.
ज्या वाडीत पहिल्या घरी पालखी जाणार ते यजमान देवाला न्यायला जातात. ढोल ताशा फटाक्यांच्या गजरात देवी नव्या उत्साहाने निघते. घरोघरी पालखीच्या चार पायांना पाणी लावलं जातं. पालखी मध्यभागी विसावते गालिच्यावर, औक्षण होतं.ओट्या भरल्या जातात. देवीचं तोंड गोड केलं जातं.
सर्वांना गूळ वाटला जातो. गावकर गजर करून मोठ्याने यजमानाचं नाव घेऊन .... अमुक अमुक यांची पूजा स्वीकार कर असे देवाला विनवतो. पाठोपाठ खेळे तयारच असतात! गोमू,सोंगं हा शेतकरी वर्गाचा आवडता मनोरंजनाचा उद्योग! पंधरा दिवस पालखी पाठोपाठ जाऊन लहान मुलं गाणी म्हणतात.पुरुष माणसं महिलेचा वेश परिधान करुन गोमू होते.विशिष्ट लयबद्ध हातापावलांच्या हालचाली करत नाच होतो. यानंतर पोस म्हणजे खेळाबद्दल पैसे मागितले जातात.
पालखी नाचविणे हा कोकणातला विशेष. गोलाकार फिरत,पालखीचे खांदेकरी जलद गतीने बदलले जातात.ढोल ताशाच्या तालावर पालखीही नाचते. काहीवेळा पालखी डोक्यावर घेऊनही नाचवली जाते.हे एका घरी झालं की पुढच्या घरचे यजमान देवाला आणायला आधीच्या घरी जातात.तिथे पुन्हा हाच क्रम!
हा आनंदसोहळा वाडीतल्या प्रत्येक घरात होतौ.
घराघरात जेवणावळी होतात.रोजच्या शेतीच्या कामातून एकमेकांकडे लांब लांब वाड्यात जायला वेळ होत नाही त्यामुळे यानिमित्ताने एकमेकांना आवर्जून प्रसादासाठी बोलावलं जातंच!
एखाद्या दिवशी मांडाच्या जवळपासच्या वाडीत महिला,मुली नटून थटून पालखीभोवती लेझीमचा फेर धरतात!सगळं गाव रात्रभर नाचत राहतं असं!
रोज पालखी मांडावर आली की मांडाला प्रदक्षिणा घातली जाते. होलदेवाच्या समोर गुरव गवताचा चूड पोटवतो, बोंब ठोकली जाते आणि अर्धा मूर्धा जळलेला चूड क्षणात झाडाच्या वाळलेल्या फांदीने झटकून शांत केला जातो.
या आनंद सोहळ्याची सांगता रोमट या जत्रेने होते. मांडाभोवती दुकाने लागतात.नाटुकली सादर होतात. पालखी नाचते. उत्साह आता शिगेला पोहोचलेला असतो.
भक्तांना भेटून तृप्त झालेली देवी पुन्हा हेदृश्य डोळ्यात साठवून मंदिरात जाऊन विसावते... पुढच्या शिमग्याचीवाट पाहत!



Tuesday, 17 March 2020

येई पालखी दारात
गणगोत जमती

नक्षीची पावले
अंगणात रेखिताती!
सजली घरेदारे
चढली तोरणे
रांगोळीच्या तालावरी
रंगा येई गाणे!
लेकीबाळी सजती
नथ शोभे नाकात
कंकण सजते हाती
बाजूबंद दंडात!
ओटी भरायला
सज्ज झाल्या सुवासिनी
देवी सजून बैसली
पालखीच्या सिंहासनी!
डुलत नाचत
येई दारात अंबिका
तिच्या स्वागताला
उमलती कलिका!
फुलांची पखरण
दारी वाजतो ढोलक
गावकराच्या कानात
डुलतो लोलक!
आई येई घरा
भेटण्या लेकरास
डोळा दाटतसे पाणी
पालखी येतसे खांद्यास!
घरधनी पूजा करी
धनीण भरी ओटी
सौख्य समाधान मागे
लेकरांच्यासाठी!
खेळे येती की पाठून
गोमू नाचते सजून
शिमग्याच्या उत्सवाला
मिळे आनंदाची धून!

Friday, 6 March 2020

प्रकाशाचे गाणे (पुस्तक)

अरुणाताई विशेष आवडत्या लेखिका आणि त्यांचं स्रीविषयक लेखन मला फार जवळचं वाटतं.त्यामुळे हे पुस्तक हातात घेतलं आणि वेळात वेळ काढून संपवलं वाचून!
स्वातंत्र्यपूर्व काळातल्या स्रिया आणि त्यानी लिहीलेल्या त्यांच्या पुस्तकातल्या आठवणी! अरुणाताईंनी त्याचा थोडक्यात मागोवा घेतला आहे!त्या  महिलेच्या प्रवासाविषयी त्यांना काय वाटतं ते ही आवर्जून नोंदवलं आहे!
मलाही या महिलांबद्दल नव्याने कळलं!
कुणी महर्षी कर्व्यांच्या नात्यातल्या,तर कुणी स्वातंत्र्यवीरांची धाकटी वहिनी,कुणी एक शिक्षिका तर कुणी सर्वसामान्य गृहिणी,कुणी संघर्ष करीत राजकारणातही सहभाग घेतला तर कुणी एखाद्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य केलं!
पण आज माझ्या हातात आहेत तशा कुठल्याही सुविधा या महिलांकडे नव्हत्या! कंटाळा आला स्वयंपाकाचा तर बाहेरून मागव, नवर्‍याची हक्काने मदत घे, एखाद्या कार्यक्रमात भाग घे, मी आर्थिक दृष्याही स्वयंपूर्ण माझ्या परीने! तरीही मला अनेकदा माझं दैनंदिन आयुष्य खूप त्रासदायक वाटतं!पण सुमारे 1907 ते 1970 पर्यंतच्या काळातल्या या महिलांना असं काही उपलब्ध नव्हतं.सर्वांना उत्तम शिक्षण मिळालं असंही नाहीच! पण तरी या महिलांनी आपलं स्वतःचं कुटुंब उत्तमरीत्या आहे त्या परिस्थितीला तोंड देत सावरलं,मुलांना घडवलं आणि समाजातील दीन दुबळ्यांनाही हात दिला,त्यातून नकळत त्या स्वतःही घडत गेल्या,वाढत गेल्या,फुलत गेल्या!
महिला दिनाच्या थोडं आधीच या अशा महिलांना माझं वंदन! असं थोडंतरी जगता आलं तरी छान असं मला वाटलं म्हणून पोचवलं!

होळी

होळी हा रंगांचा सण! फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. हिला 'हुताशनी पौर्णिमा" असंही म्हणतात.
मुळात शिशिर ऋतू हा गारवा घेऊन येतो तसाच तो पानगळही सुरु करतो. पानगळ होऊन पानांचा भला मोठा ढीग जमा व्हायला लागतो. झाडांचे अक्षरशःउभे खराटे दिसायला लागतात.अशावेळी थंडीच्या गारव्यातून शरीर मनाला थोडी ऊब देणारी होळी साजरी होते. ही होळी प्रज्वल्वित करण्यासाठी ही खराटे झालेली झाडे आणि जमा झालेला पाचोळा मुख्यतः वापरावा असा संकेत आहे.
होलिका ही एक राक्षसी होती असा संदर्भ पुराणातील कथांमधे आढळतो.
हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रह्लाद हा विष्णूभक्त होता.हिरण्यकश्यपूला अमरत्वाचे वरदान मिळालेले असल्याने तो उन्मत्त झाला होता आणि त्याच्याशिवाय अन्य कोणाही देवाचे पूजन,प्रार्थना करायच्या नाहीत असा त्याचा हुकूम होता.पण त्याचाच मुलगा प्रह्लाद सतत विष्णुचे नामस्मरण करीत असल्याने त्याने आपल्या मुलालाच मारून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने आपली बहीण होलिका हिला बोलाविले.होलिका कधी अग्नीने जळू शकत नाही असा तिलाही वर मिळालेला होता. होलिकेने भक्त प्रह्लादाला मांडीवर घेतले आणि जाळून टाकण्याचा प्रयत्न केला पण विष्णुच्या कृपेने प्रह्लाद वाचला आणि स्वतः होलिकाच जळून गेली असे ही आख्यायिका सांगते.
अशा आख्यायिका आधुनिक काळाच्या कसोटीवर विश्वासनीय वाटत नसल्या तरी त्यातून सुरु झालेल्या परंपरा मात्र आजही पाळल्या जातात असे आपण अनुभवतो.मुलांना मात्र त्या परंपरेमागचा कार्यकारणभाव आपण नक्की सांगितला पाहिजे.
होळी प्रज्वलित करण्यासाठी मुळातून जिवंत झाड तोडण्याची आवश्यकता नाही. पडलेल्या झावळ्या,पालापाचोळा यांचा उपयोग करून होळी प्रज्वलित केली जाते.
संपूर्ण भारतात होळी साजरी होतेच पण महाराष्टात कोकण भागात होळीला विशेष महत्व आहे.
रबीचा हंगाम संपलेला असतो आणि पीक कापणीला येते.कोकणात तर या काळात थोडा शेतीतील निवांतपणा असतो. कोकणात शिमग्याचा हा उत्सव पंधरा दिवस चालतो.अशावेळी गावातील शेतकरी समाज वेगवेगळी सोंगे धारण करून गावात खेळ करीत फिरतात.प्रत्येक गावातील ग्रामदेवता पालखीत बसून वाजत गाजत गावातल्या प्रत्येक घरी येते.तिचे विशेष स्वागत केले जाते.
संकासुर,गोमू,नाचा,राम,लक्ष्मण,दशावतार यांचे खेळ घराघरापुढे सादर होतात.शिमगोत्सव हा कोकणात असा विशेष आनंद देणारा असतो.
समुद्रकिनार्‍यावरील बंदरांवर राहणारा कोळी समाजही होळी पेटवतो आणि दुसर्‍या दिवशी नावा सजवून समुद्रात नेऊन नावेची पूजा करतो.
होळीचा दुसरा दिवस धूळवडीचा.होळी शांत झाल्यावर तिची राख अंगाला लावण्याची प्रथा आजही ग्रामीण भागात दिसून येते.
पाच दिवसांनी येणार्‍या रंगपंचमीचा उत्सव खरंतर वसंत पंचमीलाच सुरु होतो.उन्हाळ्याची चाहूल लागल्याने वातावरणातला उष्मा सहन व्हावा म्हणून अंगावर पाणी उडवले जाते.
मध्ययुगात राजे रजवाडे आणि संस्थानिक पाण्यात केशर कालवून त्याने रंगपंचमी साजरी करत असत.
उत्तर प्रदेशात कृष्ण आणि बलरामाच्या मंदिरात होळी निमित्त रास खेळली जाते. लाठमारीचा खेळ खेळला जातो. लोकगीते गायली जातात. रंग उधळले जातात. देवळात विशेष पूजा केली जाते.
ऋतूचक्राशी जवळचा असा हा उत्सव.त्यातील पर्यावरणाला घातक गोष्टी आवर्जून टाळल्या आणि एकत्र जमून सणाचा आनंद घेतला तर पुढच्या पिढीपर्यंत हा सण आणि त्यातून मिळणारी मजा पोहोचविता येईल.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...