Tuesday, 28 January 2025

अमृताचा कुंभ


 श्राद्धाच्या अभ्यासाच्या औचित्याने तीर्थक्षेत्र महत्व,तीर्थक्षेत्री श्राद्ध व त्याचे महत्व असे विषय वाचनात आले.त्याचा माझ्यापरीने मी अर्थ लावायचा प्रयत्न केला तो असा.या सर्व संकल्पना उदयाला आल्या त्यावेळी असलेली भौगोलिक परिस्थिती,निसर्गाची आणि माणसाची समरसता,भौतिक गोष्टींची (आजच्या तुलनेत)कमतरता,एकत्र कुटुंबजीवनशैली ,कृषीचे महत्व आणि विभिन्न समाजघटकांनी एकमेकांच्या हाती हात घालून पुढे जाणे.

भारतावरील बाहेरील आक्रमणे विचारात घेता यात ढवळाढवळ नक्की झाली पण तरीही हे सारं एकजिनसी असल्याने ते टिकून राहिलं.संघर्षातही जनमानसांच्या मनात जपलं गेलं.

पाप पुण्याच्या कल्पनांनी आणि कर्माच्या सिद्धांताने तीर्थस्थानांकडे जाण्याची ओढ वाढली.अपुर्‍या किंबहुना फारशा सुविधा नसताना वनातून,आडवाटातून,डोगरांमधून वाट काढीत इच्छित स्थळी पोहोचण्याची अनाम ओढ माणसाला व्यक्ती म्हणून नक्कीच समृद्ध करणारी ठरणारी असेल.आणि म्हणूनच कदाचित या सार्‍या दिव्यातून सुखरूप परतल्यानंतर मावंदं घालून ईश्वराप्रती कृतज्ञता व कुटुंबासह आनंद घेण्याची पद्धती रूजली असावी.

तीर्थावर श्राद्ध केल्याने गेलेल्याला काही मिळेल? माहिती नाही.पण माझ्या आप्तजनांसाठी काहीतरी चांगलं केल्याचं समाधान मला मिळेल.स्थानिक पुरोहितांच्या उदरनिर्वाहात माझ्या दानाने,दक्षिणेने भर पडेल.दिवंगताचे श्राद्ध करताना माझं आयुष्य मी कसं घालवलं? आता कसं आहे? पुढे कसं जाईल?त्यासाठी मी काय करायला हवं? याचा हिशेब मांडण्याची संधीही मानवी मन घेत असेल!

तो वैनतेय! एक महत्वाची जबाबदारी त्याच्या पंखावर घेत उडला.त्या जबाबदारीला अर्थ होता.सद्गुणांच्या जोपासनेची एक भूमिका त्याला बजावावी लागली.तो ही कोणत्या तरी क्षणांना थकला! आणि मग त्याने एक क्षणांचा break घेतला.आपणही थकतो नं गरूडभरारी घेताना... मग एक pause हवाच.पण तो pause ही बहुजनमनाची श्रद्धा वाढविणारा,आस्था जपणारा ठरावा.समाजाला मूल्ये,परंपरा,आस्थांची जपणूक करण्यासाठी प्रोत्साहन देणारा व्हावा.

दानं संविभागः। असं म्हणत धर्मशास्रकारांनी गृहस्थ आणि गृहिणीवर समाजव्यवस्थेची जबाबदारी सोपवली आहे.सामाजाच्या दूर दूर कोपर्‍यात आपल्या उपासना सांभाळत जीवन व्यतीत करणारे जे कुणी,त्यांच्याही जगण्याची काळजी काही अंशी मी घ्यावी.रोज नाही मला त्यांना भेटता येणार पण तीन चार वर्षातून एकदा मी जावं आणि पहावं की ते काय करतात! सरधोपट आयुष्याचा अनुभव घेताना हे असं काही पाहिलं की आपली कुरकुर बंद होते आणि आपण highly privileged आहोत हे ही समजतं.त्याने ते स्वेच्छेने स्वीकारलेलं असलं तरी ते सोपं नाही हे ही कळू लागतं.

विविध उपासनापंथांचं दर्शन घडणे,ज्या संसारी जगातून आपली सुटका अटळ त्यापासून काही दिवस मोकळीक व थोडे व्रतस्थ राहून स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी कुंभमेळा देत असावा!

अमावास्येचं महास्नान! ती काळी असते कारण त्या रात्री चंद्र आपल्याला दिसत नाही,पण तो असतो! त्यामुळे अशा काळ्यारात्रींच्या निमित्ताने दिवसा नदीमातेच्या कुशीत पावन व्हावं,दुसर्‍या दिवशीची प्रतिपदा मनात ठेवूनच!

ज्यांचं आयुष्यच पुण्यसलिलेकाठी जात असेल त्यांना नदीत स्नान रोजचंच! पण तीर्थाचं महत्व म्हणूनच अधोरेखित झालं असावं! नाव घेऊन तुमचा नावाडी तिथे येईल आणि तुम्ही तिथे नावेत बसाल ते तीर्थ,ती जोडणी.

मनामनांची,समाजघटकांची,जीवाशिवाची अशी जोडणी... आणि त्यासाठी महाकुंभ!

घटाकाशातून महाकाशात विलीन व्हायचंच आहे कधी ना कधी,आपलाही घडा फुटेलच आज ना उद्या पण त्यापूर्वी अमृताचे चार थेंब आपल्यावरही शिंपडून घेऊ! तो परमेश्वरी आशीर्वादाचा कुंभ सर्वांना पावन करो!


Monday, 27 January 2025

Unconditional.....

 "ऊठ आता शाळा आहे".

"काही अभ्यास वगैरे करायचा आहे की नाही?

"किती हा पसारा?

"आवर लवकर,झोपून राहू नको.

"काहीतरी मोठं ध्येयं ठेव आयुष्यात!

"तुला माझ्यासाठी वेळच काढायचा नसतो.तू सदैव तुझ्याच कामात"

"अग फोन वगैरे काही करशील की नाही कधी? असंच असतं तुझं!"

"सगळं जर मीच करायचं मग तू काय करणार?"

"ही जबाबदारी फक्त माझी आहे का? तुझं नाही का काही यात?"

"ती नं अशीच वागते.तिच्यात बदलाची सुतराम शक्यता नाही!!!टाळलेलंच बरं तिला/त्याला"

काय आहे हे सारं? अपेक्षांची एक न संपणारी यादी.

मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकाने ही वाक्य मोठ्याने किंवा मनातल्या मनात कुणा ना कुणासाठीतरी नक्कीच उच्चारली असणार आहेत.हो ना?

अपेक्षा.... आणि त्यांची पूर्तता न झाल्याने होणारी चिडचीड,येणारा राग,उचंबळून येणारा तिरस्कार,अवहेलना,दुःख आणि बरंच बरंच काही...

चार पायांची माणसं यातलं काही करत नाहीत बरं आणि म्हणून त्यांच्या प्रेमाला Unconditional म्हणतात.....

ती वेळेवर खाऊ मागतात,त्यांच्या नैसर्गिक वेळापत्रकात बदल झालेले त्यांना स्वीकारता येत नाहीत... बर्‍याचदा ही मंडळी कुटुंबाचा भाग असल्याने एक व्यावहारिक अडकलेपणही येतंच येतं.त्यांच्यामुळेही आपली चिडचिड होतेच.

पण अशावेळी हीच चार पायांची माणसं तुमच्या गळ्यात पुढचे दोन हात? पाय? टाकतात,तुमच्या पायांना अंग घासतात,चेहर्‍याने तुम्हाला ढुशी देतात,नखं न लागतील किंवा दात न लागतील अशी हळूच चावा घेतात..... आणि क्षणात आपण विरघळून जातो.अशा प्रेमाने सच्चा माणूस कधीच स्वत:ला थोपवू शकणार नाही हे प्रेम स्वीकारल्याशिवाय! कितीही भीती वाटली तरी एकदातरी तुम्ही या माणसांना थोडं घाबरत घाबरत का होईना पण हात लावाल,त्यांच्या जवळ बसाल कारण आपली त्यांच्याकडून काही अपेक्षा नसते.

"आज वेळेवर उठून क्लासला का गेला नाहीस"? हे आपल्याला बोक्याला आपण विचारत नाही...

"हे काय आज इतका वेळ काय कानात वारं भरल्यासारखं  सैरावैरा धावणं रानात?" असं आपण गाईला वा वासराला विचारत नाही.

"तू जरा तोंडात पिशवी धरून जा आणि खाली जाऊन दोन भाज्या घेऊन ये" असं आपण घरातल्या भूभूला म्हणत नाही... जरा ताजी बघून आण आणि भाव करुन पहा जरा काकांशी.

"स्वतःचा पिंजरा जरा स्वच्छ कर! उगीचच माझंही एक काम वाढतय अशाने" असं पाळलेल्या लव्ह बर्ड ला म्हणत नाही नं आपण!

कारण माहितीच असतं आपल्याला!

हे लेखन open ended ठेवलय.प्रत्येकजण यातून आपापल अर्थ लावेल आणि योग्य निष्कर्षाप्रत येईल असं वाटून हे लिहीलय...

असं जगता आलं तर आयुष्य अधिक उजळेल.

सव्वातीन वर्ष आमचं आयुष्य लख्ख उजळून निघालं आहे या निरपेक्ष प्रेमात.....



Monday, 20 January 2025

Walking on the Edge

 एखादं पुस्तकं कसं मनाच्या कोपर्‍यात जाऊन बसतं नं! या पुस्तकाचं आणि माझं तसंच झालं! मला प्रवास आवडतो आणि प्रदेशांमधले,निसर्गामधले,माणसांमधले बदलही टिपायला आवडतात.सोबत कॅमेरा असला तर त्याच्या लेन्समधूनही काही न्याहाळणं आनंददायी असतं. प्रत्येकवेळी ते जमतं असं नाही मग अशावेळी अशी पुस्तकं हात देतात आणि आपणही त्यांच्यासह ऊखादा विशिष्ट प्रवास करुन येतो.

हे जरा अनवट,अनघड वाटांवरचं चालणं,एखादं व्रत घेतल्यासारचं! आणि या प्रवासाचं निवेदनही अतिशय प्रामाणिक आहे हे मला सर्वाधिक भावलं!

मी काहीतरी विलक्षण ध्यासाने झपाटून निघालो आहे आणि मला कुणाचीच आठवण येत नाही असं नाहि.प्रस्तुत लेखकाला आपल्या आईची काळजी जाणवते आहे.पत्नी आणि मुलीच्या आठवणीने तो सद्गदित होतो आहे हे मला अधिक महत्वाचं वाटलं!

काहीतरी भन्नाट करुन पाहताना त्याच्या अल्याड पल्याडचे अनुभवही आपल्या पोतडीत भर टाकत असतात.काही वेडे अनुभव आपल्याला शहाणं करतात.हे सारं या पुस्तकात आहे.

नर्मदा परिक्रमेवर आधारित पुस्तकं वाचायला मला म्हणूनच आवडतं.ध्येय निश्चित आहे पण प्रवासातली अनिश्चितताही आहे.आज कुठे रहायला मिळेल? काय खायला मिळेल? कुणी वाटेत भेटेल की नाही? या सार्‍या विचारांना मागे टाकत मैय्या आपल्याला तारून नेईल हा विश्वास अशा वर्णनांमधून वाचायला मिळतो.

वाॅकिंग आॅन द एज मधे सह्याद्रीपर्वतरांगांमधून केलेली भटकंती आहे.तिलाही अनिश्चितताही आहे.पण त्याजोडीने एक खुमारीही आहे.

या प्रवासात काहीवेळा कुठे रहायचंय,कुणाला भेटायचंय याची निश्चिती वाचताना जाणवली तरीही हे लक्षात येतं की लेखकाला त्याबद्दल शाश्वती नाही.तरीही तो चालतो आहे...

वळणं अनोळखी,प्रदेशही अनोळखी,माणसं तर त्याहूनही अपरिचित! पण तरीही तो पुढे जातो आहे.सह्याद्रीचं विविधरंगी सौंदर्य त्याला भर ग्रीष्माच्या तल्खलीतही सुंदर भासतं आहे.

कधी तो थकला आहे,कधी सुखावला आहे..काहीवेळा अमावास्येच्या रात्री अनोळखी मंदिरात एकटाच विसावला आहे तर त्याचवेळी पाणी न मिळाल्याने स्वतच्या शरीरातलं टाकाऊ पाणीही तो प्यायला आहे!

 या सार्‍या प्रवासाचं नियोजन,पूर्वतयारी,प्रत्यक्ष प्रवास,आडेवाटेवरल्या रानावनांमधे भेटलेली व आपलंसं करणारी माणसं आणि त्यांच्या गंमती, काही टप्यांवर ठरवून सोबत आलेले परिचित स्नेही,सवंगडी आणि या सार्‍याच्या हातचं न राखून केलेल्या प्रामाणिक नोंदी!

हे सारं मला भावलेलं.तुम्ही पुस्तक मुळातून वाचलंत तर तुम्हालाही नवं काही गवसेल! 

मी अजून शेवटच्या प्रकरणातच रेंगाळते आहे.माझा वाचनवेग पाहिला तर कदाचित सलग चार पाच तासात मी हे पुस्तक खाल्लंही असतं! पण हा प्रवास मलाही स्वतःबरोबर घडविणारं हे सोपं सरळ साधं पुस्तक मला अजूनही खिळवून ठेवतं आहे...त्यामुळे मी ते पुरवून पुरवून वाचलं आहे... मी ही अजून सह्याद्रीतच घुटमळते आहे या लेखकदादांसोबत!


राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...