मनात विचारांचं काहुर पेटवत ती क्षितीजावर रेंगाळत राहिली....
तिची छाया परिसरात आणि मनातही पसरू लागली.....
क्षितीजावर तिच्या गुलाबी झाकेचे विभ्रम दाखवत ती येऊ घातलेल्या रात्रीलाही मोहात पाडत राहिली...
नदीच्या प्रवाहाच्या मध्यभागी असलेल्या शिवमंदिरातल्या आरतीमधे ती ही नतमस्तक झाली आणि चिमुकल्या मंदिरातल्या चिमुकल्या परिसरात चेतविलेले छोटे छोटे दीप तिचं सौंदर्य अधिक खुलवत राहिले...भक्तिभावाने हात जोडले जण्यापेक्षा ते दृश्य हृदयात कोरून ठेवण्यातच मी ही रमले...
नावेतल्या प्रवासात चुबूक चुबूक आवाजाच्या साथीने डहुळणारे पाणी त्या संध्येच्या गूढ वातावरणाला अधिक गहिरं करीत होते...कुणीही कुणाशी काहीही बोलत नव्हतं...
आकाशही आता हळूहळू सजू लागलं.एकेक चांदणी येऊन सरत्या संध्येचा निरोप घेत होती आणि येणार्या रात्रीचे स्वागत करत होती...
दूर कुठेतरी पक्ष्यांचा एक चुकार थवा अजूनही आकाशात रेंगाळत होता...
लांबवर दिसत होता दिव्यांनी उजळलेला,इतिहासाच्या पाऊलखुणांनी सजलेला महेश्वरचा अहिल्याबाईंचा राजवाडा व घाट,मंदिरं....
दूरवर पाहिलं की असंख्य ज्योती आपलं रूप पाण्यात न्याहाळत स्वतःच्या तालातच डोलत होत्या.... एक,दहा,शंभर,हजार.... नाव थोडी जवळून गेल्यावर दिसलं की चौकोनी आकाराच्या छोट्या द्रोणांमधे पहुडलेल्या त्या चिमुकल्या ज्योती एकत्र येऊन संपूर्ण नदीचं पात्र झगमगून टाकत होत्या...
सहस्रधारा आपल्याच नादात रोरावत,कुणाचीही फिकीर न करता,आपला आब सांभाळत पुढे जात होत्या.... त्यांचा धाकही वाटला त्या कातर छायेत...
तिच्याकाठी निवांत बसून अशीच एक संध्याकाळ अनुभवावी आणि मनातली हुरहुर तिच्यातच रिती करावी...असं खूप वर्ष मनात होतं...ते तिने असं जुळवून आणलं.....
आठवला तो...आपल्या भाळीची ती ठुसठुसती जखम शांत करायला...तेल मागत फिरणारा...तिच्याच काठी..कित्येक युगे..
त्या संध्याकाळी माझीही एक नव्हे तर असंख्य भळभळत्या जखमा मलाच सामोर्या आल्या..... मी नाही कुणाकडे काही मागत फिरले त्यांचा दाह कमी करायला कारण माझ्या अंतरंगात डोकावून,आपल्या शीतल पवित्र जलाची फुंकर तिने त्या करकरीत तीनसांजेला माझ्यावर हळुवार घातली...
अनंत जन्मांचं तिचं माझं ऋण काल तिने फेडलं आणि माझ्या असंख्य जखमांना तिने शांत केलं... तिच्या जलाने,तिच्या पात्रात डुलत राहिलेल्या सहस्र तेजस्वी ज्योतींनी....

No comments:
Post a Comment