Tuesday, 3 July 2018

पाऊले चालती पंढरीची वाट

काही घटना अशा असतात की ज्या चुकणार अशा कल्पनेनेच मनात काहुर माजतं. पुण्यात दरवर्षी येणारी पालखी ही त्यापैकीच एक घटना.
१९९० पासून मी दरवर्षी पुण्यात पालख्या येतात त्यादिवशी त्यांचा आनंद घेतला आहे. इतक्या वर्षात दोन तीन अपवाद वगळता मी नक्की हजेरी लावली आहे. या आठवणी माझा आनंदठेवा आहेत.
अशा घटना म्हणजे रस्ते बंद,गर्दी,अस्वच्छता ही अनेकांची धारणा अहे आणि ती चुकीचीही नाही.फार कशाला माझा नवरा असं म्हणणार्‍या लोकांच्यात अग्रस्थानी आहे.
पण काहीही असलं तरी जायचच ही सवय मला माझ्या बाबांनी लावली.
आळंदीला सतत जाणं असल्याने आणि मी दरवेळी बाबांचं शेपूट असल्याने मला ही आवड लागली खरं तर. तो माहोलच वेगळा असतो. भक्तीने भरलेला,हुरहुर दाटवणारा.
शाळेत असेपर्यंत वेगळी मजा! त्यादिवशी शाळा अर्धा दिवसच असायची. कधी घरी जाते असं व्हायचं.
त्यावेळी तुलनेने लवकर येत असत दिंड्या.आता उशीरच होतो.कारण संख्या वाढली.
काॅलेजला गेल्यानंतरची सर्व वर्ष विनया आणि काकू अणि मी असं त्रिकूट जात असू. माझं अणि विनयाचं उनाडणं हा स्वतंत्रच विषय आहे.
लग्न झाल्यावर एक वर्ष हट्टाने नवरोबाला नेलं मी कारण त्याचं आॅफिस मागच्याच चौकात होतं तेव्हा. पण लहान मुलासारखं त्याचं चल चल म्हणणं अणि त्याचे विचार ऐकणं यापेक्षा हे बाळ घरी किंवा आॅफिसातच बरं असं ठरवून मी एकटीच जायचं नक्की केलं.
संत्रिकेत तर मी सतत घड्याळ पहायचे. लगतच्या कुमठेकर आणि लक्ष्मी रस्त्यावरचे स्पीकर गाऊ लागले की मला बाहेर पडायचे वेध लागत.
रस्त्याभर असलेली स्वागताची तयारी, रांगोळीच्या पायघड्या घालणारे कलाकार, पोलिसांची लगबग, रंगीबेरंगी खेळणी आणि फुगे विकणारे अशी धम्माल असते ती.दोन्ही बाजूंना हवशे!नवशे! गवशे हिंडतात तरी नाहीतर मोक्याची जागा पकडून बसतात तरी! एरवीचा फर्ग्युसन रस्ता चक्क भक्तिभावात रंगतो या दिवशी!!!
हळूहळू गर्दी वाढायला लागते. एकेक दिंडी आपापल्या गतीने येत असते.वाहनांच्या आवाजात आता टाळ मृदुंगाचे आवाज मिसळू लागतात आणि चालू वाहतूक बंद केली जाते.
कॅमेराधारी मंडळी काय काय टिपत असतात देव जाणे! असं मला पूर्वी वाटायचं. पण गेली दोन वर्ष मीही माझा कॅमेरा लटकवला आणि फिरले! प्रत्यक्ष पहावंच की पण काही साठवावंही!! या न्यायाने मीही असे अनेक क्षण,भाव कैद केले आहेत. ती मजा आणि नेमका क्षण टिपण्याचा आनंद शब्दबद्ध करणच कठीण आहे!
वारकर्‍यांना सुविधा पुरवणारे गट सज्ज होतात. कुणी वार्ताहर मुलाखती घेत असतो.कुणी मालिकेतल्या नायिका तिथे येऊन आपली भाविकता नोंदवत असतात अणि बघे त्यांना टिपत असतात.
आम्हीही भुकेच्या जाणीवेने आधी पोटोबा करून घ्यायचो. समोर दिसलेल्या कुणातरी वारकर्‍याला विचारलं जातच की माऊली किती लांब आहेत अजून!!! माऊली लांबच असतात पण तुकोबांचा अश्व पुढे येतो. हातात गंधाचे नाम ताटलीत घेऊन फिरणार्‍यापुढे जाऊन उभे राहणे हे तर नित्यनेमासारखेच आहे! हौशी पालक आपल्या लेकरांना भर गर्दीतही पारंपरिक पोशाखात आणतात तिथे. त्यांची तंत्र सांभाळताना पालकांचीही कसरत होत असते. आळंदीपासून चालत आलेले भाविक पुणेकर त्यांच्या मंद झालेल्या चालण्याच्या गतीवरूनच ओळखता येतात. एखादा संबळवादक, वीणेकरी एकटा सापडला की मग क्लिकक्लिकाट सुरु!
हौशी दिंडीकर बघ्यांनाही सामील करून घेतात आणि झिम्मा फुगड्या रंगतात!
गर्दीचा आवाज टिपेला जातो. अक्षरशः मुंगीलाही जागाा नसते. दिवसभर दमून काम करून आलेले दुचाकीधारक पोलिसांची बंदी पाहून अधिकच चिडचिडतात. या सगळ्या गडबडीत अखेर पाठोपाठ पालख्या येतात.दर्शनासाठी झुंबड उडते. शेव गाठ्या खाजा विकणारे,माळा विकणारे,मुखवटे विकणारेही आत याच गर्दीचा भाग होऊन जातात.
त्यातून मार्ग काढत काढत मी पुढे जात राहते कारण मला जे हवं असतं ते गवसलेलं असतं. मला पादुकांना हात लावायचाच नसतो. मला पहायचा असतो वारकर्‍यांच्या मनातले ज्ञानोबा तुकोबा. अन्य उत्साही लोकांच्या नजरेतली उत्सवप्रियता!
त्यानेच तृप्त होते मी.
आता तर दूर आहे या सगळ्यापासून. पण तरीही मनात याच आठवणी रुंजी घालत आहेत. काय करणार असे पीळ सहसा सुटत नाहीत जे तुम्हाला अंतर्बाह्य समृद्ध करतात.

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...