Thursday, 11 July 2019

आषाढी

एक अनामिक ओढ#आषाढी एकादशी#
माझ्या आजोळच्या कुटूंबात वारीची परंपरा आहे. माझे पणजोबा ज्यांना "राया" म्हणत असत ते वारीला जायचे असं ऐकलं आहे. कितीही पाऊस असला तरी ते वडाळ्याच्या विठोबाच्या दर्शनाला जात असत ही मावशीने सांगितलेली आठवण.
दादरला बालपण गेल्यामुळे आषाढी आणि वडाळ्याचा विठोबा जो प्रति पंढरपूर म्हणून ओळखला जातो त्याचं दर्शन हे समीकरणच जुळलेलं!
ती जत्रा आजही आठवते. मला तेव्हा विठ्ठलाच्या दर्शनापेक्षा वर्षातून एकदा भरणार्‍या त्या जत्रेचीच ओढ जास्त असायची.
फुगे पिपाण्या,चित्र बदलणारा कॅमेरा,गुलाबी म्हातारीचे केस असं काय काय असायचं.लाकडी तलवार,गदाही असेच. त्यावेळी हीमॅन स्पायडरमॅन यांचे  कागदी मुखवटेही मिळत.
उपवासाची खिचडी प्रसाद म्हणून वाटली जाई.भर पावसातही रेनकोट छत्री वागवत अर्धवट भिजत आम्हीही जात असू.
मोठी झाल्यावर तुका म्हणे देह भरिला विठ्ठल हे बाबांच्या निरूपणात कधीतरी ऐकलं!
मग संतांच्या अभंगातून विठोबाला शोधत राहिले.
आणखीन समज आल्यावर वारीला जाणार्‍या वारकर्‍यांच्या स्वरात,मृदुंगात,डोळ्यात विठ्ठलाची ओढ दिसायला लागली. प्रबोधिनीत दरवर्षी होणार्‍या भजनांच्या सुरावटीतही विठ्ठल भेटू लागला.
काव्यातून,लेखनातून म्हणजे गद्यातून आणि पद्यातूनही पांडुरंग पाझरु लागला.
इतकी स्थित्यंतरं झाली तरीही आजही त्याला भेटण्याची ओढ अनिवार!
आषाढीच्या काळ्या ढगात तो भेटेल, भक्तिभावाचा वर्षाव करीत सर्व जग आनंदाने भरून टाकेल,भारून टाकेल.
तुमचीही विठ्ठलाची ओढ अशीच कायम राहो.
शेवटी काय काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल ही चिरंतन आणि शाश्वत ओढ आहेच प्रत्येकासोबत...


No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...