Tuesday, 26 May 2020

समिंद्रा

समिंद्रा आज जरा उदास होती. अजून नाव घेऊन गेलेले तिचे बाबा परत आले नव्हते! आई पण थोडी काळजीत होती. भर समुद्रात बाबांचं आणि तिच्या दादाचं,काकाचं बरेच दिवस जाणं आता तिला सवयीचं झालं होतं! पण तरी अजूनही तिला सर्वांची आठवण येतच असे.
बाबा मोकळ्या वेळात तिला होडीवर घेऊन जात. काका होडीची किरकोळ दुरुस्ती करीत असे. ती ठाकठाक आवाजाची गंमत तिला आवडे.दादा तिच्याशी वाळूत क्रिकेट खेळत असे. समुद्रात चेंडू गेला की तो आणण्यासाठी दादाबरोबर पोहत जायला तिला गंमत वाटे.कोळ्याचीच लेक ती लाटांवर नाही पहुडली तर मजा काय?
पण आज मात्र बाजार भरला तरी घरची नाव काही दिसेना!
आजानेही चौकशी केली. पण घरच्या नावेचा पत्ता नव्हता.बंदरावरच्या आॅफिसमधे आईच्या खेपा सुरु झाल्या होत्या पण बहुधा नावेपर्यंत सिग्नल पोचत नव्हता असं काहीतरी तिथले लोक सांगत होते!
संध्याकाळ उतरत होती! ज्या नावा मासे घेऊन परतल्या होत्या त्यांच्यातले मासे उतरवले जात होते.शेजारपाजारच्या कोळणी आपापले मासे वेताच्या टोपलीत घालून धुवत होत्या.धुतलेले मासे दुसरं कुणीतरी चिरून ठेवत होतं! टोपल्या टोपल्यातून वेगवेगळ्या रंगाचे,आकाराचे मासे मांडून ठेवले जात होते. त्यावर ताव मारायला समुद्रपक्षी आकाशातून किनार्‍यावर झेपावत होते. माशांची साठवण करायला काहीजण यंत्रावर काढलेला बर्फाचा चुरा विकत घेत होते. तो बर्फ खायला समिंद्राला आवडत असे.गारगार बर्फ हळूच जिभेवर विरघळे! पण आज मात्र तिचं कशाकशात लक्ष लागत नव्हतं! ती नुसतंच हे सगळं पाहत होती!साठवणीचे मासे संपल्यामुळे आई,आजा सगळे थंड बसून नावेकडे डोळा लावून होते!
बाजार संपत आला तशी गर्दी ओसरायला लागली! आजूबाजूचे येऊन चौकशी करू लागले! सर्जा वेसावकर काका आले. "वर्दी कळवायला हवी पोलिसात जाऊन" असं आईला म्हणाले!
पण समिंद्रा मात्र हे एकून तडक समुद्राकडेच धावली!
तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं!
"सागरद्येवा! तुझी मी लाडाची आहे नं रे! म्हणून तर तुझं आणि माझं नावसुद्धा एकच आहे! माझं ऐकशील का?
लहान मुलांचं सगळ्ळं ऐकतो देव असं मोठी माणसं म्हणतात! ऐक नं रे माझं! आणि माझ्या घरच्या लोकांना घरी घेऊन ये रे लवकर! किती वाट पाहते आहे मी!
तू जर त्यांना आणलंस तर माझा चेंडू मी तुला खेळायला देऊन टाकेन.पण आण नं रे लवकर घरी सगळ्यांना! मी माझ्या होडीची पण वाट पाहते आहे! पुनवेला मला तिच्यावर जाऊन नाचायला भारी आवडतं! आण ना रे लवकर!!!! सर्वांना..."
समिंद्रा हिरमुसली होती पण वाट पाहत होती!!
रात्र व्हायला लागली.आजी आणि आजाबरोबर ती घरी जायला निघाली! आई शेजारच्या तांडेल काकांबरोबर पोलिसाकडे जायला तयार झाली.
समिंद्रा मागे वळून वळून समुद्रदेवाला सांगत होती!!!!
तशीच घरी पोहोचली.जेवली नाही की झोपली नाही!!!
सकाळ व्हायला थोडा वेळ होता तेवढ्यात दारात बसलेला आजा उठला आणि धावत सुटला किनार्‍यावर!
समिंद्राने पाहिलं तर नाव किनार्‍याला लोटत बाबा दादा काका येत होते!!! ती इतकी खुश झाली की नाचायलाच लागली!
दिशा न मिळाल्याने भर समुद्रात नाव भरकटली होती पण आकाशातल्या धुरूव बाळाने दिशा दिली होती नावेला!!!
सगळे सुखरूप परत आले! सगळा कोळीवाडा जमा झाला होता!
बाबा दादा समिंद्राला शोधत होते! खूप दमले होते पण छोट्या समिंद्राला तेही खूप दिवस भेटले नव्हते नं!
पण समिंद्रा कुठे होती! आपल्या मुठीतला चेंडू सागरदेवाला खेळायला देण्यासाठी ती केव्हाच किनार्‍यावर पोहोचली सुद्धा होती!!!

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...