Thursday, 31 May 2018

ए जिंदगी गले लगा ले....


ताम्हाण्यात घराच्या छपराचं काम पूर्ण करून आमचे दोन सुतार सहकारी त्यांच्या गावी मार्गस्थ झाले.घरभरणीला आठवण ठेवा बरं असं म्हणूनही गेले.गावाच्या भंडार्‍याला आणि खेळ्यांना या बरं वहिनी असंही म्हणून गेले.याला आठवडा नाही झाला तो  वृत्तपत्र वाचताना आशुतोषने मला बातमी दाखवली. ती खरी असेल काय या शंकेने अस्वस्थ झालो.एका माणसाचा वडाचं झाड तोडताना मृत्यू. नाव, गाव, सगळं जुळणारं आणि वडाच्या झाडाचा संदर्भही.क्षणभर हललो आतून दोघेही. आणि नंतर कळलं की आमचं छप्पर पूर्ण करून गेलेला सुतारच होता तो निधन पावलेला.
घरासमोरचं वडाचं झाड तोडण्याच्या ईर्ष्येने पेटलेला,मांडव घालायचा आहे त्यासाठी ते मी तोडणारच असं आमच्या इथेही म्हणून गेला.गावाला परतला आणि शेवटी  वडाचं झाड तोडतानाच गेला.तपशील कळला नाही. मृत्यूने बोलावल्यासारखाच गावाला गेला असं म्हणून आम्ही सुन्न झालो.
इतकं सोपं आहे का हे सगळं? बडबड्या सुतारदादा आणि त्याची ईर्ष्या. रिबांचं काम करतानाची त्याची धांदल आठवली.एकत्र बसून सगळ्यांनी कलिंगडं खाल्ली, ऊन तापत होतं म्हणून शीतपेयही प्यायलो भल्यामोठ्या बाटलीतलं आणि त्याच्या इतर पुरूष सहकार्‍यांबरोबरच्या गप्पाही आठवल्या. स्थापत्यकार आणि मालकीण अशा दोन महिलांचं म्हणजे अनुज्ञाचं आणि माझं  साईटवर वावरणं याचं या गटाला अप्रूपच वाटतं.
तो दादा गेला पण माझ्या घराला छप्पर देऊन गेला.व्यवहार हा पैशाचा असतो आणि तो झालाही.पण जाताजाता मला दोनच दिवस घराच्या छपरावर उन्हात काम करणारा तो दादा कायम आठवत राहील.आर्या.

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...