Tuesday, 3 September 2024


हरितालिकेची पूजा हे कुमारिकांचे व्रत आहे.किशोरवयात येणार्‍या मासिक धर्माचे नियमन होण्यासाठी या व्रताच्या सांगतेला रुईच्या पानाला तूप लावून ते चाटण्याची परंपरा आहे... अनेकांना हे माहिती नसतं त्यामुळे आपण सर्वांना संबोधित केलं पाहिजे हे आमचे मा.यशवंतराव वेळोवेळी सांगत असत.त्यातलाच हा एक प्रयत्न! काळ बदलतो तसे संदर्भही बदलतात त्यामुळे दरवेळी नव्याने काही मांडणं औचित्याचं आहे!


मैत्रीण कशी असावी? याचंही उत्तम उदाहरण म्हणजे हे व्रत! पतीची निवड कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे व्रत!

शिवाचं वास्तव्य कुठे तर स्मशानात! हाती भिक्षेसाठी काय  तर कवटी! रूप इतकं सुंदर !की अंगाला ती माखलेली  राख ती सुद्धा चिताभस्म! तरीही तिला त्याचाच मोह पडला नं!(हे आजच्या काळातील मुलींनी शिकण्यासारखं आहे!) पटकन् कशाचाही मोह पडला आणि त्यातून टोकाचे निर्णय घेतले गेले... त्यातून काय काय घडतं आहे आजच्या समाजात!!!! पार्वतीचा आदर्श मानावा आणि विचारपूर्वक आयुष्यभराचे निर्णय घ्यावेत! कारण शिव आणि शक्तीचं हे अद्वैत हे समाजापुढे ठेवलेलं एक रूपक आहे! 

सखी आणि पार्वती ही अशी मैत्री आहे की जी पार्वतीला चुकीच्या वळणावर नेत नाही.ती सखीही तितकीच महत्वाची ठरते हे पण लक्षात घेण्यासारखं आणखी एक रूपक! कुणाच्या सहवासात असावं,कुणाकडे गुपित खुलं करावं हे सुद्धा मुलींना समजायलाच हवं!

विष्णुसारखं उत्तम स्थळ नाकारून पार्वती जेव्हा शंकराला वरते आहे तेव्हा त्यामागे दडलेला अर्थ समजून घेत घेत हरितालिकेचं व्रत करणं आवश्यक आहे!

हिरव्यागार झालेल्या पृथ्वीतत्वाकडूनही सर्जन शिकावं,दुसर्‍याला आनंद द्यावा आणि असंच बहरत जावं!

पण यात स्वतःच्या स्वत्वाचा वासर पडू देऊ नये.

गणेश चतुर्थी आणि हरितालिका ही स्वतंत्र व्रते आहेत हेसुद्धा ध्यानी घ्यावं.

समोर मांडलेल्या दोन महिलांच्या वामनमूर्तीची पूजा ही बाजारपेठेतली नाविन्याची कल्पना आहे. (हल्ली या मूर्तीही आधुनिक महिलांचे प्रतिबिंब वाटाव्या अशाच सजलेल्या असतात.)

मूळ व्रत वाळूची शिवपिंडी करावी आणि त्याची पूजा करावी असं आहे.

शिवशक्तीचा अटीतटीचा खेळ चालला भुवनपटी

त्रिगुणांचे ते तीनच फासे चराचरांतुनी निनादती!

तो खेळ असाच सुरु राहणार आहे! कारण तो खेळला गेला नाही तर विश्वाचा व्यापार सुरू कसा राहणार?

मला दरवर्षी हरितालिकेला कैलास लेण्यात पाहिलेलं कैलास शिल्प आठवतं.दशानन रावण पर्वत हलवतो आहे पण शिव शांत आहेत! जराही चलबिचल नाही! मागे दासी घाबरून पळताना दिसते आणि तिचा अंबाडाही सुटला आहे तो सावरायचीही तुला शुद्ध नाही.शिवाशेजारी बसलेली पार्वती घाबरून त्याला केवळ बिलगली आहे! त्यातलं तिचं मार्दव विलक्षण मोहमयी आहे.

समाजात वावरताना कसं वावरावं,संकटकाळीसुद्धा आपल्या सहचरावर अढळ विश्वास ठेवावा अशी अनेक रूपकं मला त्यात सापडत गेली आहेत...

मला जशी सापडली तशी ती तुम्हालाही सापडत जावोत...

©डाॅ.आर्या जोशी

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...