Sunday, 6 July 2025

स्री उपनयन-एक संस्कार,एक परंपरा

स्री-उपनयन-एक संस्कार,एक परंपरा
डाॅ.आर्या आशुतोष जोशी
(फोन 9422059795)

हिंदू धर्मातील एक वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना म्हणजे संस्कार!   हे संस्कार मनुष्याच्या जन्माआधीच सुरु होतात आणि त्याला शेवटचा निरोपही संस्कारपूर्वक दिला जातो हे लक्षात घेण्यासारखे आहे.
गर्भाधानापासून सुरु होणारा हा प्रवास अंत्येष्टी संस्कारापाशी येऊन थांबतो.हे सर्व संस्कार व्यक्तीचे व्यक्तित्व घडवितात,त्याला समृद्ध करतात,सक्षम करतात.
आयुष्याच्या विविध टप्प्यांवरील महत्वाचे संस्कार म्हणजे नामकरण,उपनयन,विवाह हे होत.
व्यक्तिमत्वाची पायाभरणी करणार्‍या वय वर्ष आठ ते बारा या काळात होणारा उपनयन संस्कार किंवा मुंज हा संस्कार अतिशय महत्वाचा आहे.

उप म्हणजे जवळ आणि नी -नय म्हणजे नेणे.मुलाला ज्ञानप्राप्तीसाठी गुरुंजवळ घेऊन जाणे याला उपनयन संस्कार असे म्हटले जाते.

आपल्याला कल्पना नसते की वैदिक परंपरेत केवळ मुलाचे नाही तर मुलीचेही उपनयन होत असे.तिला मंत्रपठणाचा,ज्ञान मिळविण्याचा,पौरोहित्य करण्याचा अधिकारही भारतीय ज्ञान परंपरेने दिलेला आहे.
चला समजून घेऊया थोडं सविस्तर याविषयी-

ऋग्वेद हा भारतीय परंपरेचा आद्यग्रंथ!  ऋग्वेदात केवळ पुरूष ऋषींनी  रचलेल्या सूक्तांचा समावेश नसून ऋषिका म्हणजे महिलांनी रचलेली २७ सूक्ते ऋग्वेदात समाविष्ट आहेत.  शौनक रचित बृहद्देवता या ग्रंथात या महिलांची नामावली दिलेली आहे.(२.८२.८४)
कक्षिवान यांची पुत्री घोषा हिने आपल्या सूक्तात अश्विनीकुमारांची स्तुती केलेली आहे.(ऋग्वेद १०.३९)
विश्ववारा,जुहू,सरमा,सर्पराज्ञी अशा विविध ऋषिकांचे उल्लेख आपल्याला दिसून येतात.

 वैदिक काळात मुलींनाही शिक्षण मिळत होते. त्यांच्याही अभ्यासाची सुरुवात उपनयन संस्काराने होत असे. त्यांना गायत्री मंत्राचा उपदेश केला जाई. कन्यांचे उपनयन झाल्यावर त्या गुरुगृही राहून त्या वेदाध्ययन करीत असत. 

पुराकल्पे कुमारीणां मौंजीबंधनमिष्यते।
अध्यापनं च वेदानां सावित्रीवाचनं तथा।।(वीरमित्रोदय,संस्कारप्रकाश ४०२-४०३)

अध्ययन पूर्ण झाल्यानंतर समावर्तन संस्कार केला जाई.समावर्तन म्हणजे सोडमुंज.या विधीमधे ब्राह्मणिने सुगंधी द्रव्य आपल्या मुखाला लावावे,क्षत्रियाने खांद्याला लावावे,वैश्याने पोटाला लावावे आणि कन्यांनी ओटीपोटाला लावावे असे  आश्वलायन गृह्यसूत्र (३.८.११)
 यामधे सांगितले गेले आहे हे नोंद घेण्याजोगे आहे.

ब्रह्मचर्याचे पालन करून अध्ययन पूर्ण करणाऱ्या कन्येला सुयोग्य वराची प्राप्ती होते, असे अथर्ववेदात म्हटले आहे.
ब्रह्मचर्येण कन्या युवानं विन्दते पतिम् । अ.वे.११.९.१६ ऋषिका जुहू ही बृहस्पतीची पत्नी होती. प्रमादामुळे त्याने पत्नीचा त्याग केला होता. तथापि वैदिक संहितांचे अध्ययन-अध्यापन करून तिने स्वतःचे उर्वरित जीवन व्यतीत केले. विश्वावरा आत्रेयी हिने स्वतःच यज्ञाचे पौरोहित्य केले व अन्य स्त्रियांनाही तसे करण्याचा उपदेश केला. अग्नीची पूजा करण्यास तत्पर आणि विद्वानांचे स्वागत करणाऱ्या विश्वावरेला यज्ञकर्ती म्हणून संबोधिले आहे.उपनयन संस्कार झाल्याखेरीज वैदिक काळात असे अधिकार प्राप्त होत नसत.

वैदिक काळापासूनच स्त्रियांचे उपनयन होत असे. संहिता, ब्राह्मणे, आरण्यके व उपनिषदे यामध्ये स्त्रियांच्या उपनयनाचे संदर्भ आढळतात. संस्कार रत्नमालेच्या उपनयन प्रकरणात हारीतस्मृतीतल्या वाचनाला धरून स्त्रियांचे दोन प्रकार सांगितले आहेत. 
ब्रह्मवादिनी- ब्रह्मतत्त्वाचे अध्ययन करू इच्छिणारी ती ब्रह्मवादिनी. तिचे उपनयन करून तिला वेदाध्ययन करू द्यावे. २. सद्योवधू - संसाराची इच्छा बाळगणारी असेल ती सद्योवधू. तिचे उपनयन करून लगेच तिचा विवाह करावा, असे सांगितले आहे. 
यज्ञ हा वैदिक धर्माचा मेरुदंड मानला जाई. कौशीतकी ब्राह्मणात पथ्यास्वस्ति ही स्त्री उत्तरेकडचा खडतर प्रवास करून अध्ययन करते व तिच्या पारंगततेबद्दल वाच् ही उच्च पदवी मिळविते असा संदर्भ आहे. व्याकरणकार पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथात तसेच पतंजलीच्या महाभाष्यातही काही स्त्रिया आचार्य या नात्याने अध्यापन करीत, असे उल्लेख आढळतात.(अष्टाध्यायी ४.१.६३) पतंजली (४.१.७८)



गार्गी व मैत्रेयी यांच्या कथा बृहदारण्यक उपनिषदांत आल्या आहेत. त्यांची नावे सामान्यपणे सर्वांना माहिती असतात.(बृहदारण्यक २.४,४.५)
कात्यायनी व मैत्रेयी या याज्ञवल्क्य ऋषींच्या दोघी पत्नी. कात्यायनीला प्रामुख्याने गृहकृत्याची आवड होती तर मैत्रेयी ही ब्रह्मवादिनी होती. याज्ञवल्क्यांनी संन्यास घेण्यापूर्वी मैत्रेयीला तिच्या इच्छेनुसार ब्रह्मज्ञान दिले. पृथ्वीवरील वैभवापेक्षाही अमरत्वाचे ज्ञान मैत्रेयीला अधिक महत्त्वाचे वाटले.

विदेह देशाच्या राजा जनकाने बहुदक्षिण यज्ञ केला व आवाहन केले की सर्वश्रेष्ठ ब्रह्मज्ञानी ब्राह्मणाने शिंगाना सोने बांधलेल्या एक हजार गाई न्याव्यात. याज्ञवल्क्य ऋषींनी पुढाकार घेतल्यावर अन्य ब्राह्मणांनी त्यांच्याशी शास्त्रचर्चा केली परंतु याज्ञवल्क्य ऋषींनी त्यांना निरुत्तर केले. त्यानंतर गार्गी वाचक्नवी पुढे आली आणि तिने याज्ञवल्क्य ऋषींशी शास्त्रचर्चा केली. गार्गी मर्यादेचे उल्लंघन करून प्रश्न विचारते आहे असे मानून याज्ञवल्क्य ऋषींनी तिला धमकी दिली की तुझे मस्तक गळून पडेल. पण गार्गीला त्याचे भय वाटले नाही. ज्याप्रमाणे पुरुष ब्रह्मचारी राहून तप, स्वाध्याय, योग इत्यादी द्वारे ब्रह्मपद प्राप्त करीत असत त्याप्रमाणे स्त्रियाही परमार्थाची वाटचाल करीत असत.

रामायण काळातील स्त्रियांना धर्मशिक्षण दिले जात असे. सीता, कौसल्या, तारा, वेदवती, स्वयंप्रभा यांना वैदिक शिक्षण दिले होते. सीतेचे उपनयन झाले असून ती सायंसंध्या करीत असल्याचे उल्लेख सापडतात.
संध्याकालमनाः श्यामा ध्रुवमेष्यति जानकी।
नदीं चे मां शुभजलां संध्यार्थे वरवर्णिनी।। (वा.रा.५.१४.४९)
श्रीराम व लक्ष्मण यांना विश्वामित्रांबरोबर पाठविण्यापूर्वी कौसल्येने त्यांचे स्वस्त्ययन केले.( वा.रा.१.२२.२)  वालीची पत्नी तारा ही मंत्रविद् म्हणून ओळखली जात असे. मतंग मुनीच्या आश्रमात राहून ज्ञानार्जन करणारी शबरी सर्वांना परिचित आहे.


महाभारतातील सुलभा-जनक संवाद प्रसिद्ध आहे. सुलभा ही एक कुमारी संन्यासिनी असून प्रधान नावाच्या राजाची कन्या होती. संन्यास आणि योगमार्गाचे आचरण करणाऱ्या विदुषी सुलभेने मिथिलेचा राजा जनक याच्याशी कर्मयोग, गृहस्थाश्रम यासारख्या विषयांवर शास्त्रचर्चा केली आहे. (म.शां. ३०८ ) या सार्‍याचा अधिकार प्राप्त होण्यासाठी उपनयन झाल्यानंतर गुरुंजवळ राहून ज्ञानग्रहण करणे अनिवार्य होते.



शिक्षणाच्या अधिकारामुळे स्वतःला ब्रह्मपदी नेण्याचा अधिकार असलेल्या स्त्रीच्या सामाजिक अधःपतनाला उत्तर वैदिक काळात सुरुवात झालेली दिसते. भारतातील भौतिक समृद्धीचा मोह पडून अनेक परकीय आक्रमकांचे आघात भारताला झेलावे लागले. त्यामुळे स्त्रियांच्या विशेषतः मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. मनुस्मृतीमध्ये मनूने नोंदविले आहे की विवाह हाच मुलीचा उपनयनसंज्ञक विधी मानावा. पतिसेवा हीच तिची गुरूसेवा आणि गृहकृत्ये हेच तिचे यज्ञकृत्य होय. 
वैवाहिको विधिः स्रीणां संस्कारो वैदिकः स्मरतः।
पतिसेवा गुरौ वासो गृहार्थे अग्निपरिक्रिया।।
मनुस्मृती २.६६-६७

 
वैदिक कालापासून स्त्रियांचे धार्मिक क्षेत्रातील स्थान हिंदू परंपरेने जोपासलेले दिसून येते. भारतावर झालेली आक्रमणे, चातुर्वर्ण्याची प्रसृत झालेली संकल्पना यामुळे स्त्रियांना शैक्षणिक अधिकार नाकारले गेले, त्यांचे धार्मिक क्षेत्रातील अधिकारही काढून घेतले गेले. तथापि  अनेक सुधारकांनी केलेल्या कार्यामुळे स्त्रियांना स्वतःचा विकास करण्याचे व शिक्षणाचे अधिकार मिळाले. 

आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वस्ती यांनीही महिलांना धार्मिक कृत्यांमध्ये पौरोहित्य करण्याचे अधिकार दिलेले दिसतात. पुण्यामध्ये शंकर सेवा समिती आणि ज्ञान प्रबोधिनी या संस्थांमध्ये महिलांना पौरोहित्य शिकविले जाते व समाजात त्या सर्वदूर पौरोहित्य करतात. ज्ञान प्रबोधिनी संस्थेमधे सर्व समाजगटातील मुलींचे उपनयन करण्याची पद्धती पुनरूज्जीवित करण्यात आलेली आहे.शिर्डीजवळ साकुरी येथेही महिला पौरोहित्य प्रशिक्षण दिले जाते.

असा हा महिलांना धार्मिक कार्याचा आणि व्यक्तिविकासाचा अधिकार देणारा उपनयन संस्कार आजच्या आधुनिक काळात सर्वसमावेशक होताना दिसतो आहे.मुलांच्या बरोबरीने देशाच्या रक्षणासाठी स्रियाही आता सरसावल्या आहेत.राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथून महिलांची पहिली तुकडी नुकतीच प्रशिक्षण पूर्ण करुन बाहेर पडली आहे.अशा काळात स्रियांचे उपनयन आणि सर्व समाजगटातील स्रियांचे उपनयन होणे,त्यांना पौरोहित्याचे अधिकार मिळणे यासाठी आपण प्रयत्नशील राहणे अगत्याचे वाटते.विविध सामाजिक संस्था यामधे कृतीशील आहेत त्यांच्या कार्यात आपणही सहभाग घेणे स्वागतार्ह आहे.

(लेखिका मागील वीस वर्षांपासून हिंदू धर्मशास्र ,भारतीय संस्कृती,तत्वज्ञान या विषयातील संशोधक आहेत.२००५ साली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी स्री पौरोहित्य या विषयावर M.Phil पदवीसाठी प्रबंधलेखन केलेले आहे.लेखिका मराठी विकीपीडियावर संपादिका म्हणून कार्यरत आहेत.)

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...