Wednesday, 30 July 2025

स्वधर्माचे सिंहावलोकन-श्रावणी /उपाकर्म संस्कार



डाॅ.आर्या आशुतोष जोशी

श्रावणी हा संस्कार सर्वांना परिचित आहेच असे नाही .याचा तपशील सर्वांपर्यत  पोहोचविणे हे एक महत्वाचे काम आहे . तथापि सर्वसमावेशक गटाला समजेल असा एक प्राथमिक स्वरूपाचा परिचयात्मक लेख असावा या हेतूने हा लेखनप्रपंच !


चला समजून घेवूया  काय  आहे श्रावणीचा संस्कार ?

भारतीय ज्ञान परंपरेत शिक्षण अर्थातच वेदांच्या शिक्षणाचे स्थान आदराचे आहे असे आपल्याला दिसून येईल. लेखनकला अस्तित्वात येण्यापूर्वी मौखिक परंपरेने चालत आलेले हे ज्ञान शतकानुशतके टिकवून ठेवणारी रचना म्हणजे गुरुकुल शिक्षण पद्धती .
आधुनिक काळात शाळांमध्ये , महाविद्यालयात सत्रांची  विभागणी असते . काही विशिष्ट निमित्तांचे  औचित्य साधून सुट्टी दिली जाते . यालाच वैदिक परंपरेत अनध्याय  म्हटले जाते . कोणत्या कारणाने वेदांच्या अभ्यासातून सवलत घ्यावी याविषयीही सविस्तर मार्गदर्शन गृह्यसूत्रे,स्मृतिग्रंथ यांनी केलेले आपल्याला दिसून येईल. 

उपनयन किंवा मुंज हा धार्मिक विधी नसून तो शिक्षणाच्या आरंभीचा महत्वाचा संस्कार आहे . मुले आणि मुली दोघांचेही उपनयन होत असे . त्यानंतर गुरुकुलात जाऊन गुरूंच्या सानिध्यात पुढील शिक्षणाचा आरंभ होई . 

गुरुकुलात रहात असताना ब्रहमचर्य  व्रताचे पालन करावे लागे . ब्रहमचर्य  , गृहस्थ , वानप्रस्थ आणि संन्यास  अशा चार आश्रमांची रचना भारतीय जीवन परंपरेत दिसून येते . प्रत्येक आश्रमाची स्वतः:ची कर्तव्ये सांगितली गेली आहेत व त्यानुसार व्यक्तीचे आचरण असणे अपेक्षित मानले गेले आहे . 

काळाच्या ओघात गुरुकुल पद्धतीचा लोप झाला . काही ठिकाणी  विशेषतः  वेदांचे अध्ययन करणा-या वेदपाठशाळा  आजही गुरुकुल पद्धतीने शिक्षण देतात असे दिसून येते . परंतु अन्य आश्रमाच्या स्वरूपात काळाच्या ओघात बदल झाले . विवाह संस्कार आजही संपन्न होतात ज्यामुळे गृहस्थाश्रमात प्रवेश होतो . 

 आपले व्यक्तिमत्व घडवून आयुष्याला विधायक दिशा देणारा संस्कार उपनयन . यानंतर वयाच्या साधारण २५ वर्षांपर्यत  गुरूंच्या घरी राहून अभ्यास केला  जाईल आणि त्यासाठीचे जे नियम त्यातील एक रचना म्हणजे उपाकर्म  अर्थात श्रावणी ! 

 ज्ञानप्राप्तीची सुरुवात हिरव्यागार श्रावणात करावी हे सांगणारे आपले धर्मशास्त्रकार! ऋतू हिरवा आहे कारण नव्या वनस्पती आता उगवल्या आहेत . अशा प्रसन्न काळात श्रावण नक्षत्र असताना किंवा पंचमीला हस्त  नक्षत्र असताना ज्ञानग्रहणाचा आरंभ करावा ! याज्ञवल्क्य  स्मृतीच्या आचाराध्याय विभागात स्नातकांसाठी जे नियम सांगितले आहेत त्यामध्ये याचा समावेश होतो . 

अध्यायानां  उपाकर्म श्रावण्यां  श्रवणेन वा |

हस्तेनौषधी भावे वा पञ्चम्यां श्रावणस्य  तु || आचाराध्याय : १४२

( उमेशचंद्र पांडेय ,(संपादक) याज्ञवल्क्य स्मृती , काशी संस्कृत ग्रंथमाला ,२०२१, चौखम्बा  प्रकाशन  ),२०२१)

अथात उपाकरण उत्सर्जने व्याख्यास्याम :|श्रवणा पक्ष  ओषधीषु  जातासु हस्तेन पौर्णिमास्यां वा ध्यायोपाकर्म ||(सत्याषाढ  हिरण्यकेशी स्मार्त  संस्कार रत्नमाला द्वादश प्रकरण ।।) यामध्ये विविध गृह्यसूत्रातील  श्रावणी विधीचे उल्लेख सापडतात . 

पौष महिन्यातील रोहिणी नक्षत्रावर किंवा अष्टमी तिथीला जलाशयाजवळ बसून  आपापल्या शाखेनुसार असलेल्या गृह्यसूत्रात सांगितल्याप्रमाणे वेदांच्या अभ्यासाची काही काळापुरती सांगता करावी . याला उत्सर्जन विधी म्हटले जाई.आजच्या परिभाषेत शैक्षणिक सत्राची सांगता किंवा विश्रांतीचा काळ.

भट्ट गोपीनाथ दीक्षित यांच्या संस्काररत्नमाला  ग्रंथातही श्रावणीचे विवेचन आढळते . धर्मशास्राशी संबंधित विविध ग्रंथ श्रावणी विषयी आवश्यक ते सर्व मार्गदर्शन करतात असे आपल्याला आढळून येईल.


ऋग्वेद , यजुर्वेद, सामवेद यापैकी आपण ज्या संहितेशी संबंधित आहोत त्यानुसार आपली शाखा निश्चित होते . आपापल्या शाखेनुसार अध्ययन केले जाते व त्याला असनुसरूनच विविध संस्कार केले जातात .  

श्रावणी संस्कार ऋग्वेद शाखेसाठी श्रावण महिन्यात श्रवण नक्षत्रावर यजुर्वेद शाखेसाठी  पौर्णिमा तिथीला ,सामवेद शाखेसाठी हस्त  नक्षत्र असताना करावा असे नियम सांगितले गेलेले दिसून येतात . 

हा विधी केवळ विद्यार्थी नव्हे तर गृहस्थ , वानप्रस्थ स्वीकारलेल्या व्यक्ती , यांनीही  करावा.  प्राचीन काळी गुरुकुलात गुरूंच्या मार्गदर्शनाने त्यांच्या उपस्थितीत हा विधी केला जात असे . 


श्रावणीच्या विधीमध्ये जुने जानवे बदलून नवे धारण करायचे असा संकेत प्रचलित आहे . परंतु या विधीचा एवढाच अर्थ नाही . ब्राह्मण  क्षत्रिय आणि वैश्य यांना हा काळ हक्काच्या विश्रांतीचा असे. भारतीय संस्कृती शेतीप्रधान असल्याने घरातील शेतीची कामे आषाढातील पावसात आटोपून घ्यावी लागत . त्यावेळी चिखलाने माखलेले कपडे , जानवे यांचा त्याग करून नवे धारण करणे याला एक व्यावहारिक जोड दिसते . आजही आपण पाहतो की भातशेतीची मुख्य कामे आटोपली की श्रावण भाद्रपद  महिन्यात  पिकावर लक्ष द्यावे लागते . मग या काळात व्रते करणे, सण उत्सवांचा आनंद घेणे ओघाने आलेच . विजयादशमीला देवीने सीमा ओलांडली की मग राजे युद्धासाठी बाहेर पडत कारण पावसाळा ! मोकळ्या मैदानातील युद्धे पावसाळ्यात शक्य नसत . व्यापारही थंडावलेला असे कारण नवे पीक अजून हाती आलेले नसे . ही व्यावहारिक कारणेही समजून घ्यावीत अशीच आहेत . 


ऋषी म्हणजे द्रष्टे ! या ऋषी परंपरेचा आदर म्हणून श्रावणीमध्ये ऋषी तर्पण केले जाते . 

सहा कर्मे , तीर्थ आवाहन , हेमाद्री संकल्प ,दश स्नान , जानवे बदलणे , तर्पण , पितरांचे स्मरण  अर्घ्य दान , नमस्कार, गायत्री देवतेचे स्मरण  या सर्व विधींना यज्ञाची जोड आहे . यज्ञामध्ये  वैदिक देवतांना आहुती दिल्या जातात . श्रद्धा , मेधा ,प्रज्ञा , धारणा या ज्ञान संपादनासाठी आवश्यक देवता होत . याचा संकल्प अतिशय विचार करण्यासारखा आहे- विष्णूचे स्मरण करून त्यानंतर आपल्या गोत्राचा उच्चार करावा . त्यानंतर संकल्पात काय म्हणावे ? ज्ञात अज्ञात अशा कोणाचे मी काही घेतले असेल , चोरले असेल, खोटे  बोलले गेले असेल, पती आणि पत्नी यांच्याकडून व्रताचे उल्लंघन केले गेले असेल. चोरी केली असेल, कठोर बोलणे झाले असेल, कुणाचा विश्वासघात केला गेला असेल ,नियमांचे उल्लंघन केले गेले असेल, इंद्रियांवरील निर्बंध चुकीने मर्यादेबाहेर गेले असतील , स्वतः:वरील संयम सुटला असेल तर त्या सर्व चुकांची कबुली देणे , या दोषापासून मुक्तता होण्यासाठी संकल्प करावा असा विचार पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी मांडलेला दिसतो .
 श्रावणी म्हणजे श्रावण महिन्याचा आल्हाद अनुभवीत प्रसन्न मनाने आपल्या शिक्षणातील सत्राची सुरुवात उत्साहाने करणे होय.पण हे केवळ व्यावहारिक शिस्त म्हणून नाही तर याला देवतांच्या स्तुतीची,प्रार्थनेची जोड दिली गेली आहे.वर्षभरातील स्वतःच्या आचरणाकडेही प्रामाणिकपणे पाहून केलेल्या चुकांची कबुली व त्या चुका न करण्याचे दिलेले संकल्पपूर्वक वचन हे स्वतःच्या घडणीसाठी उत्तम माध्यम आहे.
दक्षिण भारतात विशेषतः तमिळनाडूमधे या विधीला अवनी अवित्तम म्हटले जाते. तिथेही आपापल्या शाखेनुसार श्रावणीचा विधी संपन्न केला जातो.
महाराष्ट्रातही सामूहिक पद्धतीने याचे आयोजन केले जाते.
अशी श्रावणी विधीपूर्वक सर्वांना करणे शक्य असेलच असे नाही.पण या विधीमधील आशय समजून घ्यावा व त्यानुसार आचरण करावे हे मात्र आपल्याला नक्की जमू शकेल.

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...