Saturday, 19 August 2017

भाद्रपद महिन्यातील विविध व्रते

वाच. आर्या जोशी
पौरोहित्य विभाग
ज्ञान प्रबोधिनी,पुणे

भाद्रपद महिन्यातील विविध व्रते
श्रावण हा सणांचा आणि व्रतांचा राजा म्हणून ओळखला जातो. त्यःच्या पाठोपाठ येणा-या  भाद्रपदाच्या महिन्यात सुद्धा काही व्रते येतात ज्यांच्याक्डी आपण प्रामुख्याने पूजा म्हणून  पाहतो.
वस्तुत: कोणत्याही व्रतात त्या त्या देवतेची पूजा करणे, उपवास करणे धर्मशास्त्राने विहित म्हणून सांगितले आहे.
भाद्रपद महिन्यात येणारी हरितालिका,गणेश चतुर्थी,ऋषीपंचमी,महालक्ष्मी पूजन आणि अनंत चतुर्दशी ही सर्व स्वतंत्र व्रते आहेत हे प्रारंभी लक्षात घ्यायला हवे.व्रतराज ,कृत्यकल्पतरु यासारख्या ग्रंथात तसेच मुद्गल पुराण यासारख्या पुराणातही अशा विविध व्रतांचे संदर्भ आढळतात.ही व्रते एका पाठोपाठ येत असल्याने आपण त्यांचा परस्परांशी संबंध जोडतो.पण तसा तो नाही हे नेमकेपणाने समजावून घ्यावे. लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य स्थापनेसाठी गणेशोत्सव दहा दिवसांचा केला. त्यामुळे गणेश पूजनाचा कालावधी वाढला. या सर्व काळात ही व्रते जोडूनच पाठोपाठ येत असल्याने त्या व्रतांचा परस्पर संबंध असावा असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे हे नोंदविले आहे.

१.हरितालिका-(शिव-पार्वती पूजन)
भाद्रपद शुक्ल तृतीयेला केले जाणारे हे व्रत स्त्रियांसाठी विशेषत: कुमारिकांसाठी विहित आहे. शिवपार्वती किंवा उमा महेश्वर ही जगताची माता-पिता म्हणून ओळखले जातात.स्त्रीतत्व आणि पुरुष तत्व यांच्या मेळणीतून विश्वाची निर्मिती झाली आहे म्हणून आपण या तत्वांचे पूजन करतो.आदिशक्तीच्या पूजनातून तेचे प्रकटन आपल्यात व्हावे म्हणून प्रार्थना करायची.हरिता म्हणजे जिला नेले ती, आणि आलि म्हणजे सखी.पार्वतीला शिव प्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेवून गेली म्हणून पार्वतीला 'हरितालिका ' असे म्हणतात.हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरीसंवादात आली आहे.शिवा भूत्वा शिवां यजेत् | या भावनेने हरितालिकेची पूजा करावी.
वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा करतात किंवा सखी आणि पार्वती यांची शिवलिंगासहित मूर्ती आणून  त्यांचीही पूजा करण्याची पद्धती प्रचलित आहे.संकल्प,सोळा उपचार पूजन,सौभाग्यलेणी अर्पण, नैवेद्य,आरती व कथावाचन असे या पूजेचे सामान्यत: स्वरूप असते.व्रतराज या ग्रंथामध्ये या व्रताचे वर्णन आढळतेदुस-या दिवशी रुईच्या पानाला तूप लावून ते चाटता आणि नंतर महिला आपला उपवास सोडतात.
२.गणेश चतुर्थी – (गणेश पूजन)-
भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे व्रत हे  पार्थिव गणेश व्रत’ म्हणून प्रसिद्ध आहे.पार्थिव म्हणजे पृथ्वीतून आलेले.गाणपत्य संप्रदायाच्या उपासकाला विहित असे हे व्रत आहे. श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी या एक महिन्याच्या काळात करावयाचे हे व्रत आहे. उपासकाने दररोज नदीवर जाऊन स्नान, संध्या करावी.त्यानंतर नदीकाठची माती घेवून आपल्या तळहातावर आपल्या हाताच्या अंगठ्याएवढ्या आकाराची गणेशमूर्ती तयार करावी.अथर्वशीर्ष म्हणून तिची विधिवत् पूजा करावी आणि लगेच ती विसर्जन करावी.आता आपण या व्रताच्या शेवटच्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला मृण्मय मूर्तीची स्थापना व पूजा करतो.
३.ऋषी पंचमी- (कृषी संबंधित व्रत)
या दिवशी स्त्रियांच्या रजस्वला धर्मात घडलेल्या पापांचे प्रायश्चित्त घेण्यासाठी स्त्रियांनी हे व्रत करावे असे सांगितले आहे. या दिवशी बैलाच्या श्रमाचे अन्न खाऊ नये असाही संकेत रूढ असल्याचे दिसते.
४.महालक्ष्मी पूजन- (देवी पूजन)-
भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्ष|शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचार|कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी/गौरी बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात. महालक्ष्मीचा सण हा कुलाचार म्हणून सर्व जाती-जमातीतून श्रद्धापूर्वक पाळला जातो. मांग समाजात उभ्या लक्ष्मी मांडतात. शेती हा प्रमुख व्यवसाय असणाऱ्या घरांतून मात्र स्त्रिया धान्याची राशी मांडून पूजा करतात. लक्ष्मी वा गौरीच्या मांडणीत विविधता असली तरी मूळ हेतू धान्य लक्ष्मीच्या पूजेचा,भूमीच्या सुफलीकरणाचा आहे.
५. अनंत चतुर्दशी – (विष्णु पूजन)
भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणत असतात. या दिवशी अनंत म्हणजे विष्णुची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात.  हे काम्य व्रत असून याचा कालावधी चौदा वर्षांचा  आहे.
आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजाकरून हे व्रत पूर्ण करतात.हे व्रत सार्वत्रिक नाही. कोणी उपदेशिल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास हे व्रत घेतात व मग ते कुळात चालू राहते.पांडवांना
द्यूतात   हरल्यावर १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत व्रत  करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला अशीआख्यायिका आहे.मांडवी तयार करून तिच्यावर सर्वतोभद्र मंडल काढतात.त्यावर पूर्णपात्र ठेवून अष्टदल काढतात.त्यावर सात फणांचा दर्भाच्या अंकुराने युक्त शेष नाग ठेवून त्याच्यापुढे चौदा गाठींचा दोरा ठेवतात.कुंभाला वस्त्राचे वेष्टन करतात.कुंभातील जळाला यमुना म्हणतात.शेष व यमुना यांची पूजा झाल्यावर विष्णूची सोळा उपचारांनी पूजा करतात.अंगपूजा, आवरणपूजा, नामपूजा अशा आणखी अंगभूत पूजा यामध्ये असतात.पुष्पांजली झाल्यावर अर्घ्य देतात.नंतर दोरकाची प्रार्थना  करून चौदा गाठींचा दोरा हातात किंवा गळ्यात बांधतात.जुन्या दो-राचे विसर्जन करतात.वडे आणि घारगे यांचे वाण देतात आणि व्रत देवतांचे विसर्जन करतात.
या व्रतात सर्पपूजेचे  अवशेष दिसतात असे मानले जाते. प्राचीन नागपूजक लोक वैष्णव धर्मात आल्यावर ही पूजा व्रतरूपात  आली असावी असा संकेत मानला जातो.

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...