मासिक पाळी म्हटलं की कोणत्याही स्रीला पटकन् आईच आठवते. उमलत्या अल्लड वयाचं हे गुज आईशिवाय दुसर्या कुणाशी बोलणार?
पण माझी गोष्ट जरा वेगळी होती. तेराव्या वर्षी माझी डाॅक्टर आई गेली. माझ्यासोबत बाबा होते.
शाळेत अधूनमधून माहिती मिळे कारण आमची मुलींची शाळा होती.पण तरीही पहील्या दिवशी.. मी क्लासहून घरी आले आणि जाणवलं काहीतरी वेगळं घडतय...
आई दोन महिने आधीच गेलेली होती. त्या धक्क्यातून मी अजून पुरती सावरलेही नव्हते.
त्यात आई असताना वर्षभर आधीच तिची चिंता मला जाणवत असे.ती बाबांना म्हणे की दिलीप मुळात आपली मुलगी अपुर्या दिवसांची छोटी जन्माला आलेली. त्यात बारावं वर्ष पूर्ण झालं तरी अजून हिची काही चाहूल दिसत नाही. ती डाॅक्टर असल्याने माझ्या आसपासच्या बर्याच मैत्रीणींची ही बातमी तिला लागलेली होती त्यामुळे माझा उशीर तिला सतावत होता!!!
आता आई गेलेली आणि मी भांबावलेली.तसंही आईपेक्षा बाबा लेकीला जवळचा तसाच तो मलाही होता... त्यामुळे ही गोष्ट बाबांना मिठी मारून हक्काने सांगितली आणि रडायलाच लागले.आता माझा बाबा त्या क्षणापासून माझी माऊलीही झाला.
मला ते क्षण विसरणं शक्य नाही.
शाळेत मिळालेला सॅनीटरी नॅपकीनचा नमुना पूडा मला बाबांनी कपाटातून काढायला सांगितला आणि त्यावर दाखवलेल्या चित्राप्रमाणे ते कसं वापरायचं ते शिकवलं. मला जमलं पण तरीही प्रचंड भिती वाटत होती.हे काय होतं आहे आपल्या आयुष्यात??? सगळ्यांनाच होतं नं? मग तरी कधी नं अनुभवलेलं हे काहीतरी!! आईची उणीव पदोपदी जाणवत होती. बाबा मला झोपवून माझ्या उशाशी बसलेले.पण त्यांची कामं,प्रवचनं त्यांना होतीच.
घरी नामस्मरण केंद्र असल्याने साधकांची ये जा असे. पण बाबांनी त्याक्षणी ठरवलं की याचं स्तोम करायचं नाही.आंदूला वावरू द्यायचं सहज घरात. आणि शेवटी तो तिचा नैसर्गिक धर्मच आहे!!!
चार दिवस त्यांनी मला शाळेत पाठवलं नाही कारण मी प्रचंडच घाबरलेली होते कारण आईची उणीव आणि एकूण परिस्थिती.
स्वच्छता हा या दिवसांमधला आवश्यक भाग.आश्चर्य वाटेल पण त्यावेळेला कोणताही यूट्यूबचा विडीओ नसताना बाबांनी मला स्वतः ही स्वच्छता करायला शिकवली. मुलीचं वयात येणं खूप वेगळंच असतं.तिची स्वच्छता,काळजी,कपड्यांमधे होणारा बदल हे सर्व बाबांनी खूप जवळून अतिशय शांतपणे माझ्यासाठी केलं.
वयात आल्यावर जाणवणार्या वेगळ्या कपड्यांची गरज ओळखून ते मला लक्ष्मीरोडला घेऊन गेले.दुकानाबाहेर उभं राहून त्यांनी तिथल्या ताईंशी काय बोलायचं ते मला सांगितलं!!!मला अर्थातच एकटीला आत पाठवलं आणि त्या ताईंना मी बाहेर बोलावलं.बाबांनी त्यांना शांतपणे गोष्ट सांगितली आणि थोड्या वेळात मी आवश्यक व योग्य कपडे घेऊन बाहेर आले.
आई गेलेली असल्याने मी रोज बाबांजवळ झोपत असे.पण माझे पहिले चार दिवस झाल्यावर पाचव्या दिवशी त्यांनी मला जवळ घेतलं. मला घट्ट खूप घट्ट मिठी मारली आणि म्हणाले आंदू ही मी तुला मारलेली शेवटची मिठी.मी तुझा बाप आहे पण आता तू खर्या अर्थाने मोठी झाली आहेस त्यामुळे बाबांपासूनही अंतरावर रहायचं.आणि आजपासून एकाच खोलीत आपण झोपलो तरी तू दुसर्या पलंगावर वेगळं झोपायचंसं!!!
परिचित,नातलग महिला असूनही बाबांनी माझं वयात येणं आईच्या अनुपस्थितीत फार संवेदनशीलपणे हाताळलं.आज एका मुलीची आई झाल्यावर मला ते प्रकर्षाने जाणवतयं.
मुलगी वयात आली की आजीचं गुपित तिची आई तिला सांगते पण दीपान्विता वयात येईल तेव्हा माझ्याकडून आगळ्यावेगळ्या आजोबांचं गुपित ऐकत तिचं वयात येणं साजरं करेल.आणखी काय हवं??!
Tuesday, 28 May 2019
मासिक पाळी जागृती दिवस
Subscribe to:
Post Comments (Atom)
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
उदो बोला उदो ! डॉ. आर्या आशुतोष जोशी शरद ऋतूचा मन प्रफुल्लित करणारा अनुभव देत देत घटात विराजमान होते आदिमाया, जगज्जननी ! नऊ रा...
-
मनात विचारांचं काहुर पेटवत ती क्षितीजावर रेंगाळत राहिली.... तिची छाया परिसरात आणि मनातही पसरू लागली..... क्षितीजावर तिच्या गुलाबी झाकेचे वि...
No comments:
Post a Comment