मावंदं#गंगापूजन#संगमस्नान#
हे तो तृप्तीचे तीर्थोदक#अमृतकण वेचताना# समारोप#
मी मनापासून आस्तिक आहे,ईश्वर,श्रद्धा,धारणा हे सर्व माझ्या जगण्याचे विषय आहेत कुटुंबात आणि समाजात.आपलं जगणं आधी कुटूंबातून अधोरेखित होतं आणि त्यानंतर त्याचं प्रतिबिंब समाजातही दिसायला लागतं.सुदैवाने माहेर,सासर,आणि मी जिथे अनेक वर्ष काम केलं ती प्रबोधिनी या सार्याच ठिकाणी माझ्यातली ही आस्था जपली गेली,फुलली,बहरली.पण व्यक्ती म्हणून मला या सार्या धारणांबद्दल कायमच कुतूहल वाटत राहिलं आहे,अजूनही वाटतं.
विविध ग्रंथांनी आपल्याला तीर्थयात्रा आणि त्यांचं महत्व विशद करून सांगितल.त्याचे विधी व अर्थवाद म्हणजे अमुक ठिकाणी अमुक केल्यास अमुक मिळेल असंही फल सांगितलं आणि ते करण्यास सर्व समाजाला प्रोत्साहित केलं.
या सार्याचा परिपाक असा समोर प्रत्यक्ष घडताना पाहणं हा एक दैवी योग असावा जो मी अनुभवला.तिथे ओझरत्या दिसलेल्या प्रत्येक माणसाबद्दल मला आदर आहे.
फक्त भारतीयच नव्हे तर अभारतीय सदस्यांनाही या सोहळ्याविषयी आकर्षण वाटण्याची आधुनिक पुराणे म्हणजे सोशल मीडिया! पूर्वी पारापारांवर बसून पुराणातील कथा विषद केल्या जायच्या! आज प्रत्येक मोबाईल तुम्हाला महाकुंभाची महती सांगतो आहे!
विविध घडामोडींनी चर्चेत राहिलेला महाकुंभ व त्याला गैरसोय सोसूनही किंबहुना ती गैरसोय आहे असं मनात पण येणार नाही अशा पद्धतीने लोक वावरत होते.आहे त्याचा स्वीकार करत संगमावर स्नान करीत होते.
मी डुबकी मारली नाही... इथे येऊनही कोरडीच राहिले??? मला त्या संगमावर स्वतःला बुडवून घेण्याचं आकर्षण नव्हतं... मला पहायची होती लोकं जी भाविकतेने त्या पाण्याशी स्वतःला एकरूप करत होती.कृतार्थतेचा भाव अनुभवत होती.
मी पाय बुडवले आणि तीनदा माझ्या डोक्यावर ते पाणी शिंपडून घेतलं... बस्स! माझ्यासाठी ते खूप होतं.. माझ्यापुरतं!
ओंजळीत पाणी घेऊन ते सोडलं.. माझे दिवंगत आई बाबा,सासूबाई,मावशीकाका,आजी आजोबा आणि माझ्या चार पायाच्या लेकरासाठी... या सार्यांचं असणं होतं म्हणून मी आज इथे उभी आहे या भावनेने सर्वांच्या आठवणीने व्याकुळ झाले... त्यांना मी काय देणार? संगमावरच्या तीर्थाची एक ओंजळ फक्त.....
या सार्यांनी माझ्या ओंजळीत जे घातलं आहे ते या सार्यापेक्षा कितीतरी पटीत अधिक आहे.
पण सर्वांसारखीच माझीही श्रद्धा आहे की १४४ वर्षांनी येणारा हा योग मलाही साधायचा होता.इथे येणारी प्रत्येक व्यक्ती वेगळा अनुभव घेते आहे भौतिक सुविधांबाबत! पण प्रत्येकाचे संगमस्नान प्रत्येकालाच आतून काहीतरी सकारात्मक देऊन गेलं आहे.... मला जे गवसलं ते हेच की एकाजागी बसून ग्रंथ वाचून तुम्हाला कणभर मिळेल...पण त्याचं प्रतिबिंब अनुभविण्यासाठी समाजात उतरावं लागेल...त्याचा एक भाग होऊन तुम्हाला कान,डोळे उघडे ठेवून वावरावं लागेल...मग हाती येईल ते चार दोन श्लोकांपलीकडचं आहे..... या सार्याचंच एक पुराण होईल... ते आपल्यालाच मिळून ललिहावं लागणार आहे... जनभाषेत... आणि देववाणीत.
पुढच्या पिढ्यांसाठी...त्याच्याही पुढच्या पिढ्यांसाठी कारण माझी भारतीय सनातन परंपरा कायमच अक्षुण्ण होती,आहे,राहील!!!

No comments:
Post a Comment